थोरातांसोबत भाजपचा कोल्हे गट!
हरीष दिमोटे, प्रतिनिधी अहमदनगर, 8 जून : अहमदनगर जिल्ह्यात राधाकृष्ण विखे पाटील यांची सत्ता असलेल्या गणेशनगर सहकारी साखर कारखान्याची यंदा निवडणूक चुरशीची होणार आहे. कारण, विखे यांना माजी मंत्री आणि काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी आव्हान दिले आहे. शिवाय कोपरगाव येथील भाजपच्या माजी आमदार स्नेहलता कोल्हे गटाने विखेंविरोधात थोरातांना साथ देण्याचं ठरवलं आहे. त्यामुळे आता महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची प्रतिष्ठा पणाला लागणार आहे. भाजपमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर काही दिवसांपूर्वी अहमदनगर जिल्ह्यात भाजपचे आमदार राम शिंदे आणि विखे पाटील यांच्यातील पक्षांतर्गत वाद समोर आलेला असताना आता पुन्हा तोच कित्ता गणेश सहकारी कारखाना निवडणुकीच्या निमित्ताने पुढे येतोय. भाजपच्या माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांच्या गटाने विखेंविरोधात भूमिका घेत काँग्रेस नेते बाळासाहेब थोरातांसोबत हातमिळवणी केल्याने भाजपचा पक्षांतर्गत वाद पुन्हा चव्हाट्यावर आला आहे. ही अभद्र युती असून मी उत्तर देण्यापेक्षा कारखान्याचे सभासदच त्यांना उत्तर देतील, अशी टीका यानिमित्ताने महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली. वाचा - संजय राऊत आले आणि कार्यकर्त्यांकडे पाहून संतापले, नेत्यांचे टोचले कान! विखे-थोरातांचे आरोपप्रत्यारोप विखे पाटलांच्या या टीकेला बाळासाहेब थोरात यांनी प्रतिउत्तर देत पलटवार केला. गणेशनगर कारखाना स्व. शंकरराव कोल्हेंकडे असताना त्यांनी तो चांगला चालवला. मधल्या काळात मोठ्या माणसांनी तो चालवायला घेतला मात्र चालला नाही. त्यामुळे गणेश परिसरातील अर्थव्यवस्था आणि शेतकरी अडचणीत आले आहेत. मी आणि कोल्हे शेतकऱ्यांसाठी एकत्र आलो असून आमचा हेतू चांगला आहे. आम्ही बिघडवण्याचे नाही तर घडवण्याचे काम करणार आहे. मात्र, आमच्या युतीला कुणी अभद्र म्हणत असेल तर काय बोलावे असे थोरात म्हणालेत. थोरातांना मिळालेल्या कोल्हे गटाच्या साथीने एकतर्फी वाटणाऱ्या गणेश कारखान्याच्या निवडणुकीत चुरस वाढली आहे. आधी राम शिंदे आणि आता कोल्हे यांनी घेतलेल्या भूमिकेने विखे पाटलांचे अहमदनगर जिल्ह्यातील वर्चस्व कमी करण्यासाठी भाजप मधीलच एक गट सक्रिय झालाय का? असा प्रश्न देखील यानिमित्ताने उपस्थित झाला आहे.