ZEE Marathiचा जाहीर माफीनामा ! माझी तुझी रेशीमगाठच्या विवाह विशेष भागात व्यत्यय; आज पुन्हा दाखवणार एपिसोड
मुंबई, 13 जून: झी मराठीवरील (Zee Marathi) माझी तुझी रेशीमगाठ (Majhi Tujhi Reshimgath) मालिकेतील नेहा यशच्या ( Neha Yash Wedding) लग्नाचा 2 तासांच्या विवाह विशेष भागाची प्रेक्षक गेली काही आठवडे आतुरतेनं वाट पाहत होते. अखेर काल 12 जूनला संध्याकाळी 7 ते 9 वेळेत विवाह विशेष भाग झी मराठीवर टेलिकास्ट करण्यात आला. एपिसोड सुरू झाल्यापासून जवळपास 15-20 मिनीटे प्रेक्षकांना केवळ जाहिरातीच पाहाव्या लागल्या. मुख्य म्हणजे नेहा आणि यश यांचं लग्न एपिसोडमध्ये न दाखवता केवळ जाहिराती दाखवल्यानं प्रेक्षकांनी तीव्र नाराजी व्यक्ती केली. सोशल मीडियावर मालिकेला आणि झी मराठी वाहिनीला मोठ्या प्रमाणात ट्रोल देखील करण्यात आलं. मालिकेच्या विशेष भागात आलेल्या अडचणींबाबत झी मराठी वाहिनीनं स्पष्टीकरण देत जाहीर माफी मागितली आहे (ZEE MARATHI Apology) नेहा आणि यश यांच्या विवाह विशेष भाग आज पुन्हा दाखवण्यात येणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे. झी मराठी वाहिनीच्या अधिकृत सोशल मीडियावर हँडलवरुन सविस्तर पोस्ट लिहीत वाहिनीनं क्षमा मागितली आहे. त्यांनी म्हटलंय, ‘काही तांत्रिक अडचणींमुळे माझी तुझी रेशीमगाठच्या विवाह विशेष भागात व्यत्यय आला त्या बद्दल क्षमस्व. पण तुम्हा रसिकांसाठी हाच आनंद सोहळा आम्ही आज 13 जून रोजी सकाळी 10 वाजता आणि दुपारी 4 वाजता पुन्हा एकदा दाखवणार आहोत’. हेही वाचा - vatpurnima Special: पिंकी, अबोली, अप्पूसह ‘या’ नायिका साजरी करणार पहिली वटपौर्णिमा; पाहा खास PHOTO त्यामुळे आता ज्या प्रेक्षकांना नेहा आणि यश यांच्या लग्नाचा विशेष भाग पाहता आला नाही त्यांना सकाळी 10 आणि संध्याकाळी 4 वाजता झी मराठीवर पाहता येणार आहे. त्याचप्रमाणे झी 5वर देखील एपिसोड अपलोड करण्यात आला आहे. मात्र प्रेक्षकांनी मालिकेला ट्रोल केल्यामुळे सध्या वाहिनी आणि मालिकेविषयी अनेक चर्चांना उधाण आलं आहे.
माझी तुझी रेशीमगाठ ही मालिका प्रेक्षक आवर्जुन पाहतात. नेहा आणि यश यांच्या लग्नाची गेली अनेक दिवस सोशल मीडियावर चर्चा सुरू होती. वाहिनी आणि मालिकेच्या दिग्दर्शकांनी मालिकेच्या या विशेष भागाचं जोरदार प्रमोशन करुन प्रेक्षकांची उत्सुकता वाढवली होती. परंतू ऐनवेळी झालेल्या तांत्रिक अडचणींमुळे प्रेक्षकांचा मोठा हिरमोड झाला. मात्र झी मराठीनं तात्काळ या गोष्टीची माहिती सोशल मीडियाद्वारे प्रेक्षकांनी दिली. असं असलं तरी प्रेक्षकांनी मालिकेला आणि वाहिनीला तीव्र शब्दांत ट्रोल केलं. सोशल मीडियावर कमेंट्स करत युझर्सनी वाहिनीविषयी नाराजी व्यक्त केलीय, युझर्सनी म्हटलंय, ‘झी मराठीकडून आम्हाला ही अपेक्षा नव्हती, इतक्या जाहिराती दाखवण्याची काही गरज नव्हती’. तर ‘2 तासाच्या एपिसोडमध्ये पाऊणतास तर फक्त जाहिरातीच आहेत, प्रत्येक मालिकेची जाहिरात किती वेळा पाहायची?’,असा प्रश्नही प्रेक्षकांनी विचारला. तर अनेक समजूतदार प्रेक्षकांनी वाहिनीची ही चूक पोटात घालत ‘आम्ही झी 5वर एपिसोड पाहतो’, असं म्हटलंय. झी मराठीनं मोठ्या मनानं पुढे येऊन प्रेक्षकांची जाहीर माफी मागितल्यानं अनेकांनी वाहिनीचं कौतुकही केलं आहे.