वाळवी ट्रेलर लाँच
मुंबई, 04 जानेवारी : मागच्या काही वर्षात सिनेविश्वात अनेक कलाकारांनी आत्महत्या करत आपलं आयुष्य संपवलं. अभिनेता स्वप्निल जोशी आणि अभिनेत्री अनिता दाते डोक्याला बंदूक लावून आत्महत्या करताना समोर आलेत. पण हे प्रत्यक्ष नसून हा त्यांचा नवा सिनेमा आहे. ‘वाळवी’ हा शब्द ऐकताच आपल्याला आठवते ती, लाकूड पोखरणारी किड. एवढं नुकसान करणारी हीच वाळवी जर एखाद्या नात्याला लागली तर? अशीच नात्याला लागलेली वाळवी आपल्याला परेश मोकाशी दिग्दर्शित ‘वाळवी’ सिनेमात पाहायला मिळणार आहे. सिनेमाचा थ्रिलर ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे. वाळवी या सिनेमात अभिनेता स्वप्नील जोशी, सुबोध भावे, अनिता दाते, शिवानी सुर्वे वेगळ्याच अंदाजात दिसत असून त्यांच्या व्यक्तिरेखा सिनेमाबद्दलची उत्कंठा अधिकच वाढवणाऱ्या आहेत. ‘वाळवी’ हा मराठीतील पहिला थ्रिलकॅाम सिनेमा आहे. हेही वाचा - टेलिव्हिजनवर का दाखवत नाहीत रितेश जिनिलियाचा ‘तुझे मेरी कसम’? 20 वर्षांनी कारण आलं समोर वाळवीच्या ट्रेलरमध्ये स्वप्नील जोशी आणि अनिता दाते नवरा बायको दिसत असून ते आत्महत्या करण्याचा निर्णय घेताना दिसत आहेत. मात्र हा स्वप्नीलने आखलेला डाव असून यात त्याला शिवानी मदत करत असल्याचे दिसतेय. हे सगळं होत असतानाच सुबोध त्यांना काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करतोय. क्षणोक्षणी कुतूहल वाढवणारा आणि गूढ असणाऱ्या ‘वाळवी’त स्वप्नील आणि शिवानीचा मनसुबा पूर्ण होणार की, आखलेला डाव फिरणार ? सुबोधकडे असे नक्की काय गुपित आहे? वाळवीचा या सगळ्याशी काय संबंध? याचा उलगडा 13 जानेवारीला होणार आहे.
हरीशचंद्राची फॅक्टरी, एलिझाबेथ एकादशी आणि चि. व चि. सौ. का.सारख्या उत्तम सिनेमानंतर परेश मोकाशी आणि मधुगंधा कुलकर्णी नव्या वर्षात वाळवीसारखा नवा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन आलेत. मधुगंधा कुलकर्णीनं सिनेमाची निर्मिती तर परेश मोकाशीनं सिनेमाची कथा, पटकथा आणि सवांद लिहिले आहेत. नव्या सिनेमाविषयी दिग्दर्शक परेश मोकाशी म्हणतात, ‘प्रेक्षकांना काहीतरी नवीन विषय देण्याचा माझा नेहमीच प्रयत्न असतो आणि यात मला झी स्टुडिओजची नेहमीच साथ लाभते. त्यांच्यासोबत काम करण्याचा अनुभव हा नेहमीच अप्रतिम असतो. त्यामुळे पुन्हा एकदा प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी आम्ही सज्ज झालो आहोत’.
‘वाळवी’ ही एक वेगळा विषय आहे. शेवटपर्यंत खुर्चीला खिळवून ठेवणारा हा चित्रपट आहे. अनेक तर्कवितर्क लावत असतानाच चित्रपटातील गूढ अतिशय अनपेक्षितपणे उलगडणार आहे. कलाकारांनी आपल्या भूमिका उत्तम वठवल्या आहेत.’’