आई कुठे काय करते
मुंबई, 21 डिसेंबर :‘आई कुठे काय करते’ ही मालिका पुन्हा एकदा प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेण्यात यशस्वी ठरत आहे. मालिकेत प्रत्येक व्यक्तिरेखेच्या आयुष्यात काही ना काही प्रसंग घडत आहेतच. मालिका आईची असली, तरी आईभोवतीची पात्रंही तितकीच महत्त्वाची दाखवली जातात. सध्या मालिकेत एकीकडे देशमुखांच्या घरी नव्या पाहुणीच आगमन झालं आहे. त्यामुळे सध्या तरी सगळे कुटुंबीय आनंदात आहेत. तर दुसरीकडे अरुंधती आणि आशुतोष यांची वाढणारी जवळीक प्रेक्षकांच्या पसंतीस उतरतेय. मालिकेतील प्रत्येक घडामोड सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल असते. अशातच ‘आई कुठे काय करते’ मालिकेतील पुढच्या भागाची अपडेट समोर आली आहे. अरुंधती आणि आशुतोष यांच्याविषयी मोठी घडामोड घडणार आहे. ‘आई कुठे काय करते’ मालिकेचं कथानक अतिशय उत्कंठावर्धक वळणावर येऊन पोहोचलं आहे. अरुंधती आशुतोषला आपल्या मनातील भावना सांगणार होती. पण तेव्हाच तिने अभिला त्या मुलीसोबत पाहिलं आणि मालिकेला वेगळं वळण लागलं. आता मात्र देशमुखांच्या घरात सगळं सुरळीत झालं आहे. अरुंधती आपलं आयुष्य आशुतोष सोबत काढण्याच्या विचारात असताना त्याच्या आयुष्यात मात्र अनुष्काची एंट्री झाली आहे. आता मात्र अरुंधतीची सासू कांचनच अनुष्का आणि आशुतोषला लग्न करण्याचा सल्ला देणार आहे. हेही वाचा - Bigg Boss Marathi 4: एरवी राखीच्या मागेपुढे करणाऱ्या किरण मानेंनी बायकोला समोर पाहताच दिली ही रिऍक्शन मालिकेचा नवीन प्रोमो समोर आला आहे. त्यानुसार आशुतोष अनुष्कासह देशमुखांच्या घरी बसलेला आहे. तेव्हाच कांचन सगळ्यांसमोर अनुष्काच्या लग्नाचा विषय काढते. अनुष्का अजूनही अविवाहित आहे समजल्यावर ती तिला आशुतोशसोबत लग्न करण्याचा सल्ला देते. त्यावेळी संजना, अनिरुद्धसह घरातील सगळेच उपस्थित असतात.
कांचनने अनुष्काला दिलेला हा सल्ला ऐकून सगळेच आश्चर्यचकित होतात. आता कांचनला अरुंधतीने सगळं सांगितलं असून ती असं का वागतेय ते पाहणं महत्वाचं ठरणार आहे. त्याशिवाय कांचनच्या या सल्ल्याचा अरुंधती आणि आशुतोषच्या नात्यावर काय परिणाम होणार ते पाहणं महत्वाचं ठरणार आहे. अनुष्का ही आशुतोषची खूप जुनी मैत्रीण आहे. ते दोघे लहानपणापासून एकमेकांना ओळखतात. आता बऱ्याच वर्षांनंतर या दोघांची पुन्हा भेट झाली आहे. सुप्रसिद्ध अभिनेत्री स्वरांगी मराठे अनुष्का ही व्यक्तिरेखा साकारत आहे.
तसेच सध्या बाळाच्या येण्याने देशमुखांच्या घरात आनंदच वातावरण आहे. त्यामुळे तरी अभिचा विषय मागे पडला आहे. पण येणाऱ्या काळात काय घडेल ते पाहणं महत्वाचं ठरणार आहे.आता अरुंधती काय करणार, ती अभिषेकला समजावू शकेल का, अभिषेकला त्याच्या वागण्याचा पश्चाताप होणार का, अनघा अभिसोबतच राहणार का, बाळाच्या येण्याने घरात काय घडणार हे येणाऱ्या भागात समोर येईल.