आई कुठे काय करते
मुंबई, 01 फेब्रुवारी : ‘ आई कुठे काय करते ’ ही मालिका दिवसेंदिवस प्रेक्षकांना खिळवून ठेवत आहे. या मालिकेत सतत नवनवीन ट्विस्ट समोर येत आहेत. सध्या मालिका फारच उत्कंठावर्धक वळणावर येऊन पोहोचली आहे. मालिकेत सध्या अनघाच्या बाळाच्या बारश्याची लगबग पाहायला मिळत आहे. अनघा आणि अभिच्या मुलीच्या छकुलीच्या बारश्याला देशमुख कुटुंब एकत्र येणार आहे. अरुंधतीने छकुलीचं नाव ‘जानकी’ असं ठेवलं आहे. पण याच मुहूर्तावर मालिकेत अरुंधती आणि आशुतोषच्या लग्नाची बोलणी होणार आहे. आई कुठे काय करते मालिकेचा एपिसोड अपडेट समोर आलाय. अप्पा सगळ्यांसमोरचं आशुतोषला अरुंधतीशी लग्न करण्याबाबत विचारतात, यावर आशुतोष लगेच त्याचा होकार कळवतो. हे ऐकून घराच्या सगळ्यांनाच धक्का बसतो. पण याचवेळी अप्पा चक्कर येऊन खाली कोसळतात. अप्पाना कोसळलेलं पाहून सगळ्यांनाच धक्का बसतो. अप्पा तर ठीक आहेत पण अरुंधतीच्या लग्नाचं ऐकून कांचन चांगलीच रागावली आहे. हेही वाचा - Prajakta Mali: ‘मी साडे चार वर्षांपूर्वी…’ डेटिंगबाबत प्राजक्ता माळीचा मोठा खुलासा आता नव्या अपडेटनुसार, अरुंधती घरातून निघून जाणाऱ्या आशुतोषला थांबवते. त्याला म्हणते, ‘आता जशी तुम्ही मला साथ दिलीत तशीच आयुष्यभर द्याल का? त्यावर आशुतोष म्हणतो, ‘हो, कायम तुझ्यासोबत उभा असेन. तू आनंदात राहायला हवं आहेस मला ’ हे ऐकून अरुंधती चांगलीच भावुक होते. ती म्हणते, ‘मला आनंदात राहायचा अधिकार आहे आणि तुमच्याशी लग्न करायचं स्वातंत्र्य आहे आणि ते मी करणार’. अरुंधतीच हे बोलणं ऐकून आशुतोष देखील चांगलाच भावुक होतो. त्यामुळे आता लवकरच मालिकेत आशुतोष आणि अरुंधतीचं लग्न पाहायला मिळण्याची शक्यता आहे.
‘आई कुठे काय करते’ ही मालिका अतिशय लोकप्रिय मालिकांपैकी एक आहे. मालिका टीआरपीच्या शर्यतीत सतत पहिल्या आणि दुसऱ्या क्रमांकावर असते. ही मालिका आई अर्थातच अरुंधती या पात्राभोवती फिरणारी आहे. मालिकेच्या सुरुवातीलाही वेगळा आशय असणारी कथा प्रेक्षकांना प्रचंड पसंत पडली होती. त्यामुळे अल्पावधीतच ही मालिका लोकप्रिय झाली होती. मात्र आता या मालिकेला प्रेक्षक कंटाळले की काय? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
मालिकेत सुरु असलेला ट्रॅक काही प्रेक्षकांना रुचत नसल्याचं दिसून येत आहे. एका युजरने कमेंट करत ‘आईच्या नावाने सुरु झालेल्या मालिकेत इतकी प्रेम प्रकरणे दाखवत आहात. आई आजी झाल्यानंतर तिचं लग्न दाखवत आहात. आता ही मालिका तुम्ही बंद करुन टाका’. असा संताप या नेटकरी व्यक्त करत आहेत. त्यामुळे मालिकेत घडणाऱ्या आगामी कथानकाला प्रेक्षक कसा प्रतिसाद देतात ते पाहणं देखील महत्वाचं आहे.