चेन्नई, 28 मे : देशभरात आत्महत्येच्या घटनांमध्ये होणारी वाढ चिंता वाढवणारी आहे. त्यातच 2 वर्षांच्या लॉकडाऊननंतर यात वाढ झाली आहे. काही दिवसांपूर्वी दिल्लीतील दोन मुली आणि त्यांच्या आईने प्लानिंग करुन आत्महत्या केली होती. त्यानंतर तमिळनाडूमधून (Tamilnadu Pallavaram) असाच एक प्रकार समोर आला आहे. एका इंजिनिअरने आपली पत्नी आणि दोन मुलांची हत्या केली. यानंतर त्याने स्वत:लाही संपवलं. शनिवारी (28 मे) त्यांच्या लग्नाचा वाढदिवस होता. याच दिवशी झाडं कापण्याच्या मशीनने त्याने तिघांचा गळा (Family Suicide) चिरला. यानंतर स्वत: आत्महत्या केली. या घटनेत प्रकाश (41), त्यांची पत्नी गायत्री (39) आणि दोन मुलं नित्यश्री (13), हरिकृष्णन (9) यांचा दुर्देवी अंत झाला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या अनेक महिन्यांपासून कुटुंबावरील कर्जाचं ओझं वाढत होतं. त्यामुळे कर्जावरुन नेहमी घरात वाद होत होता. शनिवारी सकाळी घर आतून लॉक होतं. बराच वेळ झाला तरी कुटुंबाने दार उघडलं नसल्यामुळे शेजारच्यांनी खिडकीतून डोकावलं, तर चौघांचे मृतदेह रक्ताने माखलेल्या अवस्थेत जमिनीवर पडले होते. सर्वांचे गळा कापले गेले होते. यानंतर शेजारच्यांनी पोलिसांना बोलावलं. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमार्टमसाठी पाठले आहेत. तपासाअंती प्रकाश याने झाड कापण्याच्या मशीनने सर्वांचा गळा कापला आणि यानंतर स्वत: आत्महत्या केल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.