मुंबई, 15 जुलै : अभियांत्रिकी प्रवेश परीक्षा असलेल्या ‘जेईई मेन’मध्ये यावर्षी पैकीच्यापैकी मार्क मिळवलेला विद्यार्थी (JEE Main 2022 Topper) पुन्हा एकदा ती परीक्षा देणार आहे. राजस्थानच्या हनुमानगढमधील नव्य हिसारिया (Navya Hisariya) याला जेईई मेन 2022च्या (JEE Main 2022) पहिल्या राऊंडमध्ये फक्त 100 पर्सेंटाईलच नव्हे, तर 300 पैकी 300 मार्कही मिळाले होते. आता या वर्षी होणाऱ्या दुसऱ्या सेशनमध्ये तो पुन्हा परीक्षेला बसणार आहे. यामुळे आपला आणखी सराव होईल, तसंच टाईम-मॅनेजमेंट स्किल वाढवण्यासाठी याचा फायदा होईल, असं नव्यचं म्हणणं आहे. काय होईल परिणाम? नियमांनुसार, दोन्ही सेशनला उपस्थित राहिलेल्या विद्यार्थ्यांचे ज्या सेशनला जास्त गुण आहेत तेच गृहित धरले जातात. त्यामुळे दुसऱ्या वेळी या परीक्षेत नव्यला कमी मार्क मिळाले, तरी पहिल्या वेळेचे जास्त मार्क अंतिम असतील. त्यामुळे नव्य निश्चिंतपणे दुसऱ्या सेशनमध्ये (JEE Main 2022 second session) परीक्षा देऊ शकतो. ‘जेईई मेन परीक्षेमध्ये दिलेल्या वेळात पेपर पूर्ण करण्यासाठी वेळेचं नियोजन करणं शिकायला मिळतं. परीक्षा दिल्यामुळे आपली किती तयारी झाली आहे, हे लक्षात येतं. तसंच, जेईई अॅडव्हान्स्ड परीक्षेसाठी हा चांगला सरावदेखील आहे.’ असं नव्यानं म्हणाला. 17 वर्षांचा नव्य सध्या आयआयटी प्रवेश परीक्षा (IIT Entrance Exam) असलेल्या जेईई अडव्हान्स्डची (JEE Advanced) तयारी करत आहे. त्याला आयआयटी बॉम्बेमधून (IIT Bombay) कम्प्युटर सायन्स शिकायचं आहे. कशी केली तयारी? नव्यने दहावीनंतरच जेईईची तयारी सुरू केली होती. कोटामध्ये असलेल्या अलन करिअर इन्स्टिट्यूटचा तो विद्यार्थी आहे. नव्य सांगतो, की त्याने कोचिंग क्लासेसव्यतिरिक्त अन्य कोणतेही वेगळे पुस्तक रेफर केले नाही. ‘मी फक्त क्लास नोट्स आणि दिलेला अभ्यास वेळेवर पूर्ण केला. दररोजचा अभ्यास वेळच्या वेळी पूर्ण करत गेल्यामुळे मला अभ्यासाचा एकदम ताण जाणवला नाही.’ असं त्याने स्पष्ट केले. बारावीनंतर ‘हे’ कोर्स करा आणि लगेच व्हा लखपती, मोठ्या कंपनीत मिळणार संधी! VIDEO जेईईचा अभ्यास करत असतानाच त्याने बारावीकडेही दुर्लक्ष केले नाही. ‘फिजिक्स, केमिस्ट्री आणि मॅथेमॅटिक्स या विषयांचा अभ्यासक्रम जेईई आणि बारावी बोर्ड परीक्षा या दोन्हीकडे सारखाच आहे. त्यामुळे जेईईच्या तयारीवेळीच माझी बारावी बोर्डाची तयारीही झाली. इंग्लिश विषयासाठी शाळेने ऑनलाईन घेतलेले क्लास आणि नोट्स पुरेशा होत्या.” असं नव्यने सांगितलं. नव्यने दहावीच्या परीक्षेच्या दोन-तीन महिने आधीच इंजिनअर होण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे दहावी झाल्यानंतर लगेच त्याने त्यादृष्टीने तयारी सुरू केली. दहावीला त्याला 97.40 टक्के गुण मिळाले होते. तर, बारावीचा निकाल अद्याप येणे बाकी आहे. त्याने सीबीएसईच्या अपाला स्कूल ऑफ एज्युकेशन या शाळेतून दहावी आणि बारावी पूर्ण केली. त्याचे वडील व्यावसायिक असून, आई सामाजिक कार्यकर्त्या आहेत.