फाईल फोटो
नवी दिल्ली, 3 मे : इंजिन ऑईल हा कारमधील सर्वांत महत्त्वाचा घटक आहे. यामुळे तुमच्या वाहनाचं इंजिन जास्त गरम होत नाही तसंच त्याला गंज लागण्यापासूनदेखील संरक्षण होतं. यामुळे तुमच्या कारचं इंजिन हेल्दी राहतं आणि दीर्घकाळ चालतं. इंजिन ऑईलचं आयुष्य कार चालवण्यावर अवलंबून असतं, असा बहुतेक लोकांचा समज असतो; पण हा समज पूर्णपणे चुकीचा आहे. इंजिन ऑईलला एक्सपायरी डेटही असते. एक्सपायरी डेट संपलेली असूनही तुम्ही त्याच इंजिन ऑईलवर कार चालवली तर इंजिन खराब होऊ शकतं. कारच्या इंजिन ऑईलचं लाइफ 10 ते 15 किलोमीटरपर्यंत असतं, असं काही जण मानतात. तेही बरोबर आहे. पण काही लोक कारचा खूप कमी वापर करतात ते इंजिन ऑईल वर्षानुवर्षं बदलत नाहीत. अशा स्थितीत इंजिन ऑईल खराब होतं आणि तरीही कार चालवली तर इंजिनही खराब होण्याची शक्यता असते.
इंजिन ऑईलचं आयुष्य नेमकं किती? सर्वसामान्यपणे, इंजिन ऑईलचं लाइफ दोन ते पाच वर्षांपर्यंत असतं. जर तुमची गाडी कोणत्याही कारणामुळे या कालावधीत 10 ते 15 किलोमीटर चालली नसेल तरी तुम्ही इंजिन ऑईल तातडीने बदलणं गरजेचं आहे. समजा तुम्ही असं केलं नाही तर कार स्टार्ट करताना इंजिन खराब होऊ शकतं. त्यामुळे इंजिन ऑईल खरेदी करताना त्याची मॅन्युफॅक्चरिंग डेट आणि एक्सपायरी डेट तपासणं आवश्यक आहे. इंजिन ऑईल कसं तपासाल? कारचं बोनेट उघडल्यानंतर तुम्हाला इंजिन जवळच गेज दिसेल. हे गेज बाहेर काढून तुम्ही इंजिन ऑईल चेक करू शकता. जर ऑईल जास्त घट्ट नसेल आणि त्यातून दुर्गंधी येत नसेल तर ते योग्य आहे असं समजावं. मात्र किलोमीटरचा विचार करूनदेखील ऑईल बदललं पाहिजे. दुसरीकडे जर इंजिन ऑईल मध किंवा त्याहून अधिक घट्ट असेल आणि त्यातून दुर्गंधी येत असेल तर त्या इंजिन ऑईलची एक्सपायरी संपली आहे असं समजावं. असं ऑईल जर कारच्या पिस्टन आणि रिंगांना चिकटलं तर तिथे ते जळून या गोष्टी खराब करेल. असं ऑईल कारमध्ये असेल तर ती चालताना काळ्या रंगाचा धूर सोडेल. त्यामुळे तुमची कार उभी असली आणि चालत नसली तरीही दर दोन ते तीन वर्षांनी इंजिन ऑईल बदलणं महत्त्वाचं आहे. यामुळे कार आणि इंजिन सुस्थितीत राहील आणि कोणतीही समस्या निर्माण होणार नाही.