विशाल देवकर, प्रतिनिधी
नागपूर, 2 फेब्रुवारी : मोठ्या कष्टाने पिकवलेला शेतमाल बाजारात नेऊन विकेपर्यंत सांभाळ करणे मोठ्या मेहनतीचे आणि कसरतीचे काम असते. नागपुरात बरेचदा पिकांना अस्मानी संकटांसह नैसर्गिक आव्हानांना तोंड द्यावे लागते. अशातच पिकांवर अनेक कीड व कीटक लागून पीक रातोरात फस्त करतात. अशाच कीटकांचा बंदोबस्त करण्यासाठी सोलर लाईट ट्रॅप हे अनोखी यंत्र तयार करण्यात आले आहे. नक्की काय आहे यंत्र आणि कसे काम करते पाहुयात.
निसर्गचक्रात अनेक जीवजंतू,कीटक यांचा समावेश असतो. पर्यावरणात प्रत्येक घटकाचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. यात काही शेतीला पूरक असतात तर काही शेतीसाठी अपायकारक ठरत असतात. शेतकऱ्यांना शेतमालाचे रक्षण करण्यासाठी अनेक शर्तीचे प्रयत्न करावे लागते. त्यात रासायनिक फवारणी देखील केली जाते. मात्र फवारणीमुळे मानवी शरीरावर काही अंशी नुकसान देखील होत असते. शेतमालाचे रक्षण करण्यासाठी शेतावरील कीटक यांचे नायनाट करून मित्र किडींचे रक्षण करण्यासाठी एक अनोखे यंत्र तयार करण्यात आले आहे.
सोलर इंसेक्ट लाईट ट्रॅप
सौर उर्जेवर चालणाऱ्या या यंत्राचे नाव सोलर इंसेक्ट लाईट ट्रॅप असे असून हे यंत्र शेतकऱ्यांसाठी मोठे उपयुक्त ठरणारे आहे. नावाला सार्थ ठरवणारे हे उपकरण पूर्णतः सौर ऊर्जेवर चालत असून यावर लावलेल्या लाईटमुळे रात्रीच्या प्रकाशात शेतातील कीटक या लाईटकडे आकर्षित होतात आणि लाईट खाली ठेवलेल्या पाण्यात पडून त्यांचा मृत्यू होतो. यात लावलेल्या लाईटचा प्रकाश हा दोन एकर परिसरात पसरतो.
मित्र किडींना धोका नाही
यात लावलेल्या टायमरमुळे सूर्यास्त झाला की हे उपकरण सुरू होतं व सूर्योदय होण्यापूर्वी हे बंद होतं. सर्वसाधारणपणे मित्र किडींचा एक काळ आणि वेळ असतो. यात साडेतीन ते साडेपाच दरम्यान शेतात मित्र किडी वावरात असतात. यादरम्यान हे लाईट ट्रॅप ऑटोमॅटिक बंद होत असते. यामुळे मित्र किडींना या लाईट ट्रॅपचा धोका नसतो.
जपानी पद्धतीनं सांगली झाली हिरवीगार, 2 वर्षांमध्येच तयार झालं जंगल, Video
90 टक्के अनुदान
जिल्हा खनिज प्रतिष्ठान नागपूर यांच्यावतीने कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन, आत्मा अंतर्गत सोलर ट्रॅप ला 90 टक्के अनुदान देण्यात आले आहे. केवळ 10 टक्के शेतकरी हिस्सा नुसार हे अतिशय उपयुक्त उपकार शेतकऱ्यांना माफक दरात उपलब्ध करून देण्यात येत आहे. बाजारात असंख्य या प्रकारची उपकरणे आहेत मात्र त्यात मित्र किडी व अन्य कीटकांचा देखील मृत्यू होतो. त्यामुळे निसर्गातील समतोल राखण्यास ते अपायकारक ठरत असतात.
डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ नागपूर यांनी संशोधनातून हे यंत्र प्रमाणित केले आहे. यामध्ये रात्री शत्रू किडींचा नायनाट होऊन मित्र किडींचे रक्षण केले जाते, अशी माहिती नरखेड तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक निलेश रिधोरकर यांनी दिली.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Agriculture, Farmer, Local18, Nagpur