नंदूरबार, 31 मे : नंदूरबार (Nandurbar) नवापूर मार्गावर नंदूरबारपासून 26 किलोमीटरवरील निंबोणी (nimboni village) गावाच्या रहिवासी असणाऱ्या रजनीताई कोकणी आणि त्यांच्या कुटूंबाने घेतलेल्या परिश्रमातून माळरानावर आमराईसह शेती फुलविली आहे. (farmer) त्यांनी फुलविलेली शेती परिसरातील अन्य शेतकऱ्यांसाठी प्रेरणादायी ठरत आहे. (agriculture success story) रजनीताई कोकणी यांनी शेतीत घेतलेल्या परिश्रमांची जोरदार चर्चा होत आहे. (Women Farmer)
निंबोणी गावात रजनीताई आपल्या कुंटूंबासोबत राहतात. त्यांचे पती भाईदास कोकणी हे निवृत्त शिक्षक आहेत. भाईदास कोकणी नोकरीनिमित्त बाहेरगावी असल्याने शेतीची जबाबदारी रजनीताई यांच्यावर असायची. रजनीताईंची शेती खडकाळ, टेकड्यांची आणि मुरबाड होती याचबरोबर पाण्याची कोणतीच सुविधा नाही. रजनीताईंनी अशा पीरस्थितीतही शेतीत क्रांती करण्याचे ठरवले.
हे ही वाचा : केरळात Monsoon आलाचं नाही? भारतीय हवामान विभागाच्या दाव्यावर स्कायमेटकडून प्रश्नचिन्ह
वेळप्रसंगी स्वत:च हातात कुदळ घेवून श्रमाची कामे केली. त्यानंतर त्यांनी ट्रॅक्टरच्या साहाय्याने शेतीचे सपाटीकरण केले. त्यासाठी त्यांनी ट्रॅक्टर चालविणे शिकून घेतले. दीर्घ कालावधीच्या श्रमानंतर खडकाळ जमीन शेती कसण्यालायक झाली. त्यांनी सुरवातीला पावसाच्या पाण्यावर आधारित कोरडवाहू शेती केली. त्यानंतर त्यांनी विहीर खोदून सिंचनाची शाश्वत सुविधा निर्माण केली. स्वत: राबून तयार केलेल्या शेतात राबण्याचा आनंद वेगळाच असतो. तो आनंद रजनीताई यांनी घेतला.
या शेतात आता त्या गहू, सोयाबीन, तूर, मका, भुईमूग, इत्यादी पिके त्या घेऊ लागल्या आहेत. तसेच कांदा, लसूण, मेथी, कोथिंबीर, वांगे, मिरची, वाल- पापडी आदी भाजीपाला पिकांचे उत्पादनही त्या घेवू लागल्या आहेत. त्यासोबतच त्यांनी भाताच्या इंद्रायणी या वाणाची सुधारित तंत्रज्ञानाच्या आधाराने लागवड करून भात उत्पादनही घेतले आहे. शेती क्षेत्रात आमूलाग्र बदल घडविणाऱ्या राष्ट्रीय कृषी नवोन्मेषी प्रकल्प अंतर्गत त्यांनी एक एकर क्षेत्रात आंबा लागवडीचा वाडी प्रयोग उत्कृष्टपणे राबविला आहे. त्यांनी उत्तम प्रजातीच्या आंब्याच्या 50 झाडांचे संगोपन केले आहे. त्यातून त्यांना चांगले उत्पन्न मिळू लागले असून परिसरासाठी एक उत्कृष्ट असे मॉडेल तयार केले आहे.
हे ही वाचा : शरद पवार आणि गोपीचंद पडळकर आमने-सामने येणार? चौंडी येथे राष्ट्रवादी-भाजप संघर्षाची चिन्हे
शेताच्या बांधावर सागाच्या दोनशे रोपांची लागवड केली आहे. सोबत बांबू, नारळ, चिकूच्या रोपांचीही लागवड केलेली आहे. आता चांगल्या प्रतीचे चिकू येवू लागले आहेत. भाजीपाल्याच्या नियोजनबद्ध लागवडीतून वर्षभर उत्पन्नाचा त्यांनी आराखडा तयार केला आहे. त्यानुसार त्या विविध भाजीपाल्याचे उत्पादन घेत आहेत. उपलब्ध पाण्याचा कार्यक्षम वापर करण्यासाठी ठिंबक सिंचन पद्धतीचा अवलंब केला आहे. वेळेची तसेच लागवड खर्चात बचतीसाठी सुधारित अवजारे व यंत्रांचा वापर त्या नियमितपणे करीत असतात. विशेष म्हणजे संपूर्ण शेती त्या सेंद्रिय पद्धतीने करतात. अशा पद्धतीने त्यांनी एकात्मिक शेती पद्धतीचा आदर्श परिसरातील शेतकऱ्यांसमोर ठेवला आहे.
त्यांनी कृषी विज्ञान केंद्र, नंदूरबार, या केंद्राच्या तांत्रिक सहकार्याने द्रौपदी महिला बचत गटाच्या माध्यमातून शेतकरी सुविधा केंद्र कार्यान्वित केले आहे. त्यासाठी कृषी विज्ञान केंद्राच्या मार्गदर्शनासह शेतीविषयक प्रत्येक प्रशिक्षणाचा त्या लाभ घेतात. फार्मर प्रोड्यूसर कंपनीच्या त्या सदस्य आहेत. कृषी विज्ञान केंद्र, नंदूरबारकडून राष्ट्रीय महिला किसान दिनाच्या निमित्ताने प्रयोगशील महिला या पुरस्काराने त्यांचा सन्मान झालेला आहे. त्यांच्या या कार्याची दखल घेवून राष्ट्रीय केमिकल्स अॅण्ड फर्टिलायझर्सद्वारे त्यांचा नाशिक येथील कार्यक्रमात ‘प्रगतिशील किसान पुरस्कार’ देवून नुकताच सन्मान करण्यात आला आहे. रजनीताई या आदिवासी शेतकरी महिलेचे शेतीतील कार्य इतर शेतकरी व महिलांसाठी आदर्शवत ठरले आहे.