बिकानेर, 22 मे : सध्या तापमान वाढीमुळे उन्हाच्या झळा अंगाची लाहीलाही करत आहेत. राजस्थानमध्ये तर सध्या तापमान 45 अंश सेल्सिअसच्या घरात पोहोचले आहे. अशा स्थितीत शरीराचे तापमान नियंत्रित ठेवण्यासाठी अनेकजण थंड पेयांचा आधार घेतात. परंतु राजस्थानमधील कडाख्याच्या उन्हात कोल्डड्रींक्स आणि ज्यूस देखील शरीराला थंड ठेवण्यासाठी मदत करत नसतील तर अशावेळी बिकानेरमधील लोक देशी पद्धतीचा अवलंब करतात. उन्हाळ्यात राजस्थानमधील बिकानेरच्या प्रत्येक घरात लोक भरड धान्यापासून बनवलेल्या राबडीचा आस्वाद घेतात. शहरातील सार्वजनिक उद्यानात अनेक विक्रेते राबडी विकत असून 15 वर्षांपासून राबडी विकणारे बजरंग कुमार म्हणतात की, दररोज 100 हून अधिक लोक त्यांच्याकडे राबडी पिण्यासाठी येतात. राबडीचा प्रभाव थंड असून तो प्यायल्याने उष्माघात होत नाही. साधारणपणे राबडीचा एक ग्लास 30 रुपयांना मिळतो. जसजशी उष्णता वाढते तसे राबडीची मागणी देखील वाढू लागते.
राबडी हे पेय उन्हाळ्यात शरीरासाठी खूप फायदेशीर असून याने पोटात थंडावा राहतो. राबडीला राजस्थानमध्ये ‘राब’ असेही म्हणतात. या राबडीचं वैशिष्ट्य म्हणजे उन्हाळा आणि हिवाळ्यात या दोन्ही ऋतूमध्ये याचा हे पेय पिले जाते. यामुळे उन्हाळ्यात शरीरात थंडावा राहतो आणि हिवाळ्यात शरीर उबदार राहते. हिवाळ्यात गरमागरम राबडी प्यायल्याने शरीर उबदार राहते. बाजरीमध्ये लोह, फॉस्फरस, मॅग्नेशियम, पोटॅशियम आणि फायबर मुबलक प्रमाणात आढळतात. राबरी प्यायल्यावर अनेकदा झोप येते, त्यामुळे लोक याला देशी बिअर असे ही म्हणतात.
अशी बनवतात ‘राबडी’ : राजस्थानमध्ये बहुतेकदा राबडी ही बाजरी पासून बनवली जाते. मातीच्या भांड्यांमध्ये सर्वप्रथम बाजरीचे पीठ टाकले जाते. नंतर ते काही काळ उकळले जाते आणि त्यामुळे ते लापशीसारखे घट्ट होते. नंतर त्यात दोन चमचे तूप, एक चमचा अजवायन, चार चमचे बाजरीचे पीठ, एक चमचा किसलेला गूळ, अर्धा चमचा मीठ, एक चमचा सुंठ पावडर, दोन वाट्या पाणी किंवा ताक यात वापरावे. राबरी थंडी करून प्यायची असेल तर त्यात बर्फाचे काही तुकडे टाकावेत. राबडी ही आज बनवली तर दुसऱ्या दिवशी- त्याचे सेवन केले जाते.