नवी दिल्ली, 27 एप्रिल : अॅपलचे सीईओ टिम कूक यांनी या आठवड्याच्या सुरुवातीला भारतात कंपनीच्या पहिल्या दोन रिटेल स्टोअर्सचं उदघाटन केलं. लाँचच्या दिवशी शेकडो लोकांनी मुंबई आणि दिल्लीतील स्टोअर्समध्ये गर्दी केली होती. टिम कूक यांनी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचीही भेट घेतली आणि कंपनी देशभरात गुंतवणूक आणि व्यवसाय वाढवण्यासाठी कटिबद्ध असल्याचं सांगितलं. भारतात अॅपलचं रिटेल स्टोअर उघडल्यानंतर सोशल मीडियावर पाकिस्तानी लोकांकडून विविध प्रतिक्रिया आल्या. परकीय चलनाचा तुटवडा आणि विक्रमी चलनवाढ यामुळे गेल्या अनेक दशकांतील सर्वांत वाईट आर्थिक संकटाचा सामना करत असलेल्या पाकिस्तानातील नागरिकांनी संताप व्यक्त केला. काही पाकिस्तानी इंटरनेट युजर्सनं सध्याच्या आर्थिक संकटासाठी पाकिस्तान सरकारला दोष दिला आहे. तर, काहींना वाटतं की, देशातील कठोर कायदे परदेशी गुंतवणूकदारांना दूर ठेवत आहेत. कन्सल्टंट सर्जन आणि व्हिजिटिंग असोसिएट प्रोफेसर उस्मान खान यांनी भारत आणि पाकिस्तानची दोन छायाचित्रे ट्विटरवर पोस्ट केली आहेत. ते म्हणाले की, जेव्हा भारत आपलं पहिलं अॅपल स्टोअर उघडत होता, तेव्हा पाकिस्ताननं एका चिनी व्यक्तीला ईशनिंदा केल्याच्या आरोपाखाली अटक केली. 2003 ते 2006 या कालावधीत पाकिस्तानच्या सिनेटचे सदस्य राहिलेल्या अमानुल्ला कानरानी यांनीही भारतातील पहिल्या अॅपल स्टोअरच्या लाँचिंगवर भाष्य करताना हीच छायाचित्रे शेअर केली आहेत.
प्राणीसंग्रहालयातील प्राण्यांना अन्न देऊ शकत नाही तर अॅपलचं काय करणार? आणखी एक ट्विटर युजर आणि आयटी प्रोफेशनल मुहम्मद तारिक बिलाल म्हणाले की, भारताला अॅपल स्टोअर मिळाले तर पाकिस्तानला आर्मी आणि आयएसआय सारख्या संस्था मिळाल्या. अॅकॅडमिक आणि फुलब्राइट फेलो नोमन सत्तार यांनी पाकिस्तान सरकारवर निशाणा साधताना म्हटलं की, “हा देश आपल्या प्राणिसंग्रहालयातील प्राण्यांची आणि आपल्या चलनाची काळजी घेण्यासही सक्षम नाही. तर आम्ही अॅपलचं काय करणार?’’ महत्त्वाची गोष्ट म्हणजे, फक्त एका आठवड्यापूर्वी, पाकिस्तानच्या जिओ टीव्हीनं एका अहवालात म्हटलं होतं की, केंद्र आणि सिंध सरकार कराची प्राणीसंग्रहालयं कायमचं बंद करण्याचा विचार करत आहेत. कारण तिथे ठेवलेल्या प्राण्यांना भयंकर परिस्थितीचा सामना करावा लागत आहे आणि त्यांना योग्य आहारही मिळत नाही. हेही वाचा - शास्त्रज्ञांनी डॉल्फिनवर लावला कॅमेरा, समुद्रातील आश्चर्यकारक दृश्य झालं कैद, पाहा Video भारताच्या तुलनेत पाकिस्तान काहीच नाही पाकिस्तानवर ताशेरे ओढत आणखी एका युजरनं लिहिलं की, ‘जेव्हा अॅपल भारतात स्टोअर उघडत होतं, तेव्हा इस्लामाबाद (पाकिस्तानी सरकार) 12व्यांदा आयएमएफकडून पैसे मिळवण्याचा प्रयत्न करत होतं.’ पाकिस्तानच्या परकीय गंगाजळीत लक्षणीय घट झाली असून, डिफॉल्ट टाळण्यासाठी सरकार आयएमएफकडून कर्ज मिळवण्याचा प्रयत्न करत आहे. असद नावाच्या आणखी एका युजरनं म्हटलं की, ‘भारताशी तुलना करण्याचं पाकिस्तानचं नाटक अखेर संपलं आहे.’ तो म्हणाला की, ‘भारताच्या तुलनेत पाकिस्तान काहीच नाही. संरक्षण अर्थसंकल्पाच्या नावाखाली पुढच्या अनेक पिढ्यांसाठी संपत्ती जमा करण्यासाठी भारताविरुद्ध शत्रुत्वाचा हा भ्रम पसरवण्यात आला आहे.’