वर्ल्ड कपसाठीचा भारतीय संघ जाहीर झाला. त्यात विजय शंकरला स्थान मिळालं आहे. 9 वन डे खेळलेल्या विजय शंकरची वर्णी यात लागली.
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात विजय शंकरने फक्त 41 बॉलमध्ये 46 धावा केल्या. त्यात त्याने 5 चौकार आणि एका षटकाराची बरसात केली.
46 धावा करून अगदी थोडक्यात तो धावबाद झाला. त्याचं हे बाद होणं त्याच्या वाढत्या चाहत्या वर्गाला अगदी चटका लावून गेलं. पण या अष्टपैलू खेळाडूविषयी एक गोष्ट माहीत आहे का…
पण विजय शंकरच्या पहिल्याच आंतरराष्ट्रीय पदार्पणानंतर त्याचं करिअर संपलं असतं जर दिनेश कार्तिक त्याच्या मदतीला धावला नसता….
गेल्या वर्षी या खेळाडूच्या क्षमतेवर प्रश्नही उपस्थित करण्यात आले होते. मार्च २०१८ मध्ये बांग्लादेशविरुद्धच्या निधास चषकाच्या अंतिम सामन्यात विजय शंकरच्या संथ फलंदाजीमुळे भारतीय संघ पराभवाच्या छायेत होता. मात्र दिनेश कार्तिकच्या तुफानी खेळीमुळे भारताला रोमहर्षक विजय मिळाला.
निधान ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात विजयने १९ चेंडूत तीन चौकारांच्या मदतीने १७ धावा केल्या. जेव्हा संघाला जलद धावा करण्याची गरज होती, तेव्हा तो मोठा शॉट मारण्याच्या नादात बाद झाला.
या सामन्यात शेवटच्या षटकात १० धावांची गरज होती. मात्र विजय शंकरमुळे टीम इंडियाने पहिल्या पाच चेंडूत पाच धावाच केल्या.
शेवटच्या चेंडूत भारतीय संघाला सहा धावांची गरज होती. टीम इंडियाच्या हातून हा सामना गेला असं वाटत असताना, दिनेश कार्तिकने शेवटच्या चेंडूवर षटकार ठोकत भारताला चार गडी राखून सामना जिंकून दिला. जर टीम इंडियाने हा सामना हरला असता तर विजया करिअरला ग्रहण लागलं असतं.
आता टीम इंडियाच्या मॅनेजमेंटने विजय शंकरवर विश्वास दाखवला आणि त्याला मेलबर्नमध्ये टीम इंडियाकडून एकदिवसीय सामन्यात पदार्पण करण्याची संधी दिली.