दुबई, 14 ऑक्टोबर : टी-20 वर्ल्ड कपला (T20 World Cup) 17 ऑक्टोबरपासून सुरुवात होत आहे, पण स्पर्धेचा सगळ्यात मोठा मुकाबला भारत आणि पाकिस्तान (India vs Pakistan) यांच्यात 24 ऑक्टोबरला होणार आहे. या हाय व्होल्टेज मॅचआधी पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमने (Babar Azam) माईंड गेम खेळायला सुरुवात केली आहे. भारताविरुद्धच्या सामन्यात पाकिस्तानचा विजय होईल, असा विश्वास बाबर आझमने व्यक्त केला आहे. आतापर्यंत वनडे (ODI World Cup) आणि टी-20 वर्ल्ड कपमध्ये (T20 World Cup) भारताचा पाकिस्तानविरुद्ध कधीच पराभव झालेला नाही. दोन्ही देशांमध्ये वनडे वर्ल्ड कपचे 7 आणि टी-20 वर्ल्ड कपचे 5 सामने झाले, यात एकदाही पाकिस्तानला विजय मिळाला नाही, तरीदेखील बाबरने यावेळी पाकिस्तानच्या विजयाचा दावा केला आहे.
आम्ही मागच्या तीन-चार वर्षांपासून युएईमध्ये क्रिकेट खेळत आहोत. इथलं वातावरण आम्हाला माहिती आहे. खेळपट्टी कशी आहे, बॅट्समनला खेळपट्टीनुसार आपल्या खेळात कसे बदल करावे लागतात, हे आम्हाला कळालं आहे. जी टीम त्यादिवशी चांगली खेळेल, ते जिंकतील. जर मला विचाराल तर पाकिस्तान हा सामना जिंकू शकते, असं बाबर म्हणाला आहे.
'एक टीम म्हणून आमचा आत्मविश्वास आणि मनोबल उंचावर आहे. भूतकाळात काय झालं त्यापेक्षा आम्ही भविष्याबाबत विचार करत आहोत. हा सामना हाय व्होल्टेज असेल, हे आम्हाला माहिती आहे. याची तयारीही आम्ही करत आहोत. आम्ही भारताल टक्कर देऊ. मॅच जिंकून आम्ही स्पर्धेत लय मिळवू,' अशी प्रतिक्रिया बाबर आझमने दिली.
IND vs PAK महामुकाबल्याआधी पुन्हा 'मौका-मौका', काचा फुटणार का टीव्ही? पाहा VIDEO
टी-20 वर्ल्ड कपमध्ये भारत कधीच हरला नाही
टी-20 वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियाचं पाकिस्तानविरुद्धचं रेकॉर्ड उत्कृष्ट आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यात टी-20 वर्ल्ड कपमध्ये 5 मॅच झाल्या, यातल्या सगळ्या मॅचमध्ये भारताचा विजय झाला. 2007 साली ग्रुप स्टेज आणि फायनलमध्ये भारताने पाकिस्तानचा पराभव केला. यानंतर 2012, 2014 आणि 2016 सालीही टीम इंडियाला विजय मिळाला. 2016 साली भारत-पाकिस्तान यांच्यात अखेरचा टी-20 वर्ल्ड कपचा सामना झाला होता. या सामन्यात पाकिस्तानने पहिले बॅटिंग करत 5 विकेट गमावून 118 रन केले होते, भारताने हा सामना 4 विकेट गमावून जिंकला होता.
भारत-पाकिस्तान रेकॉर्ड
भारत आणि पाकिस्तान यांच्यात आतापर्यंत 8 टी-20 सामने झाले आहेत, यातल्या 7 सामन्यांमध्ये टीम इंडियाचा, तर एका मॅचमध्ये पाकिस्तानचा विजय झाला. 2012 साली पाकिस्तानला अखेरचा विजय मिळाला होता, यानंतर 9 वर्षात पाकिस्तानला भारताविरुद्ध एकदाही जिंकता आलेलं नाही.
पाकिस्तानची टीम 18 ऑक्टोबरला पहिला सराव सामना वेस्ट इंडिजविरुद्ध आणि 20 ऑक्टोबरला दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळणार आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: India vs Pakistan, T20 world cup