पुणे, 18 जानेवारी : भारताचा माजी क्रिकेटपटू केदार जाधव वादात सापडला आहे. केदार जाधव हा सध्या रणजी ट्रॉफीमध्ये महाराष्ट्राकडून खेळत आहे. तामीळनाडूविरुद्धच्या सामन्यामध्ये खेळत असताना केदार जाधव अर्धवट सामना सोडून गेला. कौटुंबिक कारणामुळे गुरूवारी केदार जाधव मॅच अर्धवट सोडून निघाला, पण यानंतर तो महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष रोहित पवार यांच्यासोबत दिसला. रोहित पवार हे एमसीएचे नवनिर्वाचित अध्यक्ष आहेत, त्यांनी एमसीएची बैठक बोलावली होती, या बैठीकीत केदार जाधव सहभागी झाला. याबाबतचं वृत्त टाईम्स ऑफ इंडियाने दिलं आहे.
महाराष्ट्र आणि तामीळनाडू यांच्यात पुण्याच्या गहुंजे स्टेडियमवर रणजी ट्रॉफीचा सामना खेळवला गेला. मुख्य म्हणजे महाराष्ट्राचा कर्णधार अंकित बावने यालाही याबाबत माहिती नव्हतं. 'मॅचची पहिली इनिंग इंटरेस्टिंग वळणावर होती. महाराष्ट्राच्या 446 रनच्या पुढे जाण्यासाठी तामीळनाडूचा विजय शंकर लंचनंतरच्या सत्रातही खेळत होता. आमचे प्रशिक्षक संतोष जेधे यांनी फिल्डिंग करत असलेल्या केदार जाधवला पॅव्हेलियनमध्ये बोलावलं. आम्हीही अंपायरला काय झालं म्हणून विचारलं. यानंतर अंपायरनी मॅच रेफ्रीसोबत वॉकीटॉकीने संपर्क साधला. केदारच्या कुटुंबामध्ये आपत्कालीन परिस्थिती ओढावल्याचं आम्हाला सांगण्यात आलं,' असं अंकित बावने म्हणाला.
या प्रकरणी रोहित पवार, केदार जाधव आणि एमसीएचे सचिव शुभेंद्र भांडारकर यांच्याशी संपर्क साधल्यानंतरही त्यांनी प्रतिक्रिया दिली नसल्याचं टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तात सांगण्यात आलं आहे.
#BCCI च्या निवड समितीचे माजी अध्यक्ष चंदू बोर्डे, क्रिकेटपटू केदार जाधव यांच्यासह ॲड. कमल सावंत, शुभांगी कुलकर्णी, नीता कदम, निलीमा जोगळेकर, कल्पना तापीकर, रेखा गद्रे-गोडबोले आणि मंजुश्री पुराणीक यांना भेटून क्रिकेटविषयी अनेक विषयांवर चर्चा केली. pic.twitter.com/bmbt3pKD5q
— Rohit Pawar (@RRPSpeaks) January 13, 2023
मॅचच्या तिसऱ्या दिवशी दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. यानंतर दुपारी 4.30 वाजता केदार जाधव पीवायसी हिंदू जिमखान्यामध्ये रोहित पवारांना भेटण्यासाठी गेला. एवढच नाही तर त्यांनी फोटोही काढले. या बैठकीला माजी क्रिकेटपटू चंदू बोर्डे आणि शुभांगी कुलकर्णीही आले होते. पीवायसी हिंदू जिमखाना गहुंजेपासून 25 किमी लांब आहे, जिकडे मॅच सुरू होती.
रोहित पवार यांच्या ट्विटर अकाऊंटवरूनही केदार जाधवसोबतचे फोटो शेअर करण्यात आले. कौटुंबिक कारण देत मॅच सोडून जाणारा केदार जाधव बैठकीला जात असेल तर त्याच्यावर शिस्तभंगाची कारवाई करावी, अशी मागणी अधिकाऱ्यांकडून केली जात आहे.
महाराष्ट्राने या सामन्यात तामीळनाडूचा 404 रनवर ऑलआऊट केला, ज्यामुळे त्यांना 42 रनची आघाडी मिळाली. चौथ्या क्रमांकावर खेळणारा केदार जाधव बॅटिंगसाठी उपलब्ध नव्हता, त्यामुळे बावने आणि सौरभ नवले वरच्या क्रमांकावर बॅटिंगला आले. महाराष्ट्राने तिसऱ्या दिवसाचा खेळ 104/3 वर संपवला. केदार जाधव पुढच्या दिवशी खेळायला आला आणि 15 रनवर आऊट झाला. याआधीच्या दोन इनिंगमध्ये केदार जाधवने 56 आणि 283 रन केले.
केदार जाधव परत टीममध्ये आल्यानंतर त्याच्या कुटुंबाविषयी विचारलं तेव्हा त्याने सगळं व्यवस्थित असल्याचं केदार म्हणाल्याची प्रतिक्रिया अंकित बावने याने दिली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.