नवी दिल्ली, 6 ऑगस्ट : भारतीय क्रीडा विश्वातील कामगिरीसाठी दिला जाणारा सर्वोच्च पुरस्कार राजीव गांधी खेलरत्न (Rajiv Gandhi Khel Ratna) पुरस्काराचे नाव आता बदलण्यात आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ही घोषणा केली आहे. हा पुरस्कार आता मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार (Major Dhyan Chand Khel Ratna Award) म्हणून ओळखला जाईल. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलेल्या या घोषणेनंतर भारताचा माजी क्रिकेटपटू इरफान पठाण (Irfan Pathan) याने प्रतिक्रिया दिली आहे. इरफान पठाणने या निर्णयाचं स्वागत केलं असलं, तरी त्याने पंतप्रधानांवर अप्रत्यक्ष निशाणा साधला आहे का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. ‘खेळाडूंच्या नावाने पुरस्कार दिला जाणार आहे, या निर्णयाचं स्वागत. खेळासाठी यानंतरही अशा अनेक गोष्टी घडतील. तसंच स्पोर्ट्स स्टेडियमनाही खेळाडूंचीच नावं दिली जातील,’ असं ट्वीट इरफान पठाणने केलं आहे. या वर्षाच्या सुरुवातीला भारत-इंग्लंड यांच्यातल्या टेस्ट सीरिजदरम्यान अहमदाबादमध्ये पुनर्बांधणी करण्यात आलेल्या स्टेडियमला पंतप्रधान नरेंद्र मोदींचं नाव देण्यात आलं होतं.
Hopefully in the future sports stadium names will be after sportsmen too.
— Irfan Pathan (@IrfanPathan) August 6, 2021
काय म्हणाले पंतप्रधान मोदी? ‘मला या पुरस्काराला मेजर ध्यानचंद यांचे नाव देण्यात यावे अशी मागणी अनेक नागरिकांनी केली होती. त्यांच्या मागणीचा आदर ठेवत राजीव गांधी खेलरत्न पुरस्कारचे नाव यापुढे मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार असे असेल. जय हिंद! असे ट्विट मोदींनी केले आहे. खेलरत्न पुरस्काराची सुरुवात 1991-92 साली सर्व प्रथम करण्यात आली. विश्वनाथन आनंद हा या पुरस्काराचा पहिला मानकरी ठरला. सचिन तेंडुलकर, पी. गोपीचंद, अभिनव बिंद्रा, धनराज पिल्ले, मेरी कोम, राणी रामपाल, अंजू बेबी जॉर्ज, लिएंडर पेस या सारख्या दिग्गज खेळाडूंना या पुरस्कारानं गौरवण्यात आले आहे.
हॉकीचे जादूगर म्हणून ध्यानचंद ओळखले जातात. त्यांनी 1926 ते 1949 या कालावधीमध्ये तब्बल 400 आंतरराष्ट्रीय गोल केले. 1928, 1932 आणि 1936 साली झालेल्या ऑलिम्पिकमध्ये गोल्ड मेडल जिंकणाऱ्या टीमचे ते सदस्य होते. खेलरत्न पुरस्काराशिवाय क्रीडा क्षेत्रीतील जीवनगौरव पुरस्कारालाही (Lifetime achievement ) पुरस्कारालाही ध्यानचंद यांचे नाव आहे. हा पुरस्कार 2002 साली सुरु करण्यात आला आहे. त्याचबरोबर नवी दिल्लीतील नॅशनल स्टेडियमलाही 2002 साली ध्यानचंद यांचे नाव देण्यात आले आहे.