मुंबई, 6 एप्रिल : सध्या सर्वत्र कोरोनाने पुन्हा एकदा थैमान घातलेलं असल्यामुळे त्याच्याविषयीचेच विचार प्रत्येकाच्या मनात आहेत. क्रिकेटरसिकांना मात्र त्या भयावह विचारांपासून दुसरीकडे लक्ष वळवण्याची संधी येत्या 9 एप्रिलपासून मिळणार आहे. यंदाची इंडियन प्रीमिअर लीग (Indian Premier League) अर्थात आयपीएल क्रिकेट स्पर्धा (IPL) त्या दिवशीपासून सुरू होत आहे. आतापर्यंत पाच वेळा आयपीएल स्पर्धा जिंकलेली मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) आणि रॉयल चॅलेंजर्स बँगलोर (Royal Challengers Bengaluru) यांच्यामध्ये पहिला सामना होणार आहे. ज्याच्या नेतृत्वाखाली भारतीय टीमने अनेक विक्रमी विजय मिळविले, त्या विराट कोहलीच्या (Virat Kohli) नेतृत्वाखाली रॉयल चॅलेंजर्स बँगलोर एकदाही आयपीएल ट्रॉफी जिंकू शकलेला नाही. अनेकदा तर असं झालंय, की ती टीम प्लेऑफपर्यंतही (Play Off) कशीबशी पोहोचू शकली. भारताचा माजी क्रिकेटपटू आणि कॉमेंटेटर आकाश चोप्राने (Akash Chopra) यंदाच्या स्पर्धेबद्दलही आपला अंदाज व्यक्त केला आहे. आकाशचं असं म्हणणं आहे, की विराटची आरसीबी (RCB) ही टीम यंदा प्ले-ऑफपर्यंतचा प्रवास करण्यात अयशस्वी ठरेल. आता ही 'आकाश'वाणी खरी ठरतेय की नाही, ते येणारा काळच सांगेल.
'मला असं वाटतंय, की आरसीबी यंदा प्लेऑफपर्यंतचा प्रवासही करू शकणार नाही. गेल्या तीन-चार वर्षांचा या टीमचा प्रवास पाहिला, तर सुरुवातीला त्यांची कामगिरी चांगली होती; मात्र शेवटी ते भरकटले. सुरुवातच चांगली झाली नाही, तर त्या टीमला अडचणींशी सामना करावा लागेल,' असं आकाश चोप्राने म्हटलं आहे.
कोहलीच्या नेतृत्वाखालच्या रॉयल चॅलेंजर्स बँगलोरने 2016मध्ये अंतिम सामन्यात प्रवेश केला होता. त्यानंतर ती टीम अंतिम फेरीतही जाऊ शकलेली नाही. त्या अंतिम सामन्यात आरसीबीला सनरायझर्स हैदराबादशी मुकाबला करावा लागला होता. आयपीएलच्या एकूण स्पर्धेचा विचार केला, तर आरसीबी आतापर्यंत एकूण तीन वेळा प्ले-ऑफ पर्यंत पोहोचली आहे; पण आयपीएलची ट्रॉफी आतापर्यंत त्यांना एकदाही उंचावता आलेली नाही. मुंबई इंडियन्सने मात्र आतापर्यंत पाच वेळा आयपीएल स्पर्धा जिंकली आहे.
युएईमध्ये झालेल्या आयपीएलच्या गेल्या हंगामात आरसीबीने चांगली सुरुवात केली होती; मात्र नंतरच्या टप्प्यात त्यांची लय बिघडली. तरीही टीम प्लेऑफमध्ये चौथ्या स्थानापर्यंत पोहोचली. सनरायझर्स हैदराबादने आरसीबीचं अंतिम सामन्यात पोहोचायचं त्यांचं स्वप्न धुळीला मिळवलं. त्यामुळे यंदाच्या स्पर्धेत आरसीबी कशी कामगिरी करतो, याकडे सर्वांचंच लक्ष असेल.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Aakash, Cricket news, IPL 2021, Mumbai Indians, RCB, Sports, Virat kohli