नवी दिल्ली , 14 एप्रिल : देशात कोरोनाव्हायरसमुळे परिस्थिती बिकट झाली आहे. त्यामुळं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लॉकडाऊन 3 मे पर्यंत वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे आता सर्वात मोठी क्रिकेट लीग असलेल्या आयपीएललाही धोका निर्माण झाला आहे. बीसीसीआयच्या एका सूत्रांनी सांगितले की सध्या आयपीएल पुढे ढकलण्यात येणार आहे. बीसीसीआयच्या सूत्रांनी सांगितले की सरकारने 3 मे पर्यंत लॉकडाऊन वाढविल्यानंतर आयपीएल स्थगित करण्यात येणार आहे. यापूर्वी आयपीएल 29 मार्चपासून आयोजित करण्यात येणार होती, मात्र देशात कोरोनाचा शिरकाव झाल्यानंतर 14 एप्रिलपर्यंत स्पर्धा पुढे ढकलण्यात आला होता. त्यादरम्यान विमानसेवा रद्द करण्यात आल्यानंतर परदेशी खेळाडूंना बंदी घालण्यात आली होती. त्यामुळे आता आयपीएलला ही स्पर्धा अनिश्चित काळासाठी स्थगित करण्यात आली आहे.
या परिस्थितीत खेळणे शक्य नाही बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली काही दिवसांपूर्वी म्हणाले होते की, सध्याच्या परिस्थितीत कोणताही खेळ शक्य नाही. तर, आयपीएल अशक्य होत नाही, कारण परदेशी क्रिकेटपटूंना या वेळी येथे येणे अवघड जाईल. त्यामुळं आयपीएल स्पर्धा पुढे ढकलण्याबाबत गांगुलीने याआधी संकेत दिले होते. आता सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार 3 मेनंतर यावर निर्णय घेतला जाईल. जुलैनंतर आयपीएलबाबत निर्णय होणार? जुलै अखेरीस रिकाम्या स्टेडियममध्ये आयपीएलच्या तेराव्या हंगामाचे आयोजन केले जाऊ शकते, असे सुत्रांचे म्हणणे होते. यासाठी बीसीसीआयच्या वतीने तारखा शोधण्याचे काम सुरू आहे. यानुसार जुलै किंवा ऑगस्ट ते सप्टेंबर दरम्यान आयपीएलचा तेरावा हंगाम आयोजित केला जाऊ शकतो. दरम्यान, जर आयपीएल रद्द करण्यात आली तर बीसीसीआयला 7 हजार कोटी ते 47 हजार कोटींचा तोटा होऊ शकतो. त्यामुळे बीसीसीआय आयपीएल स्पर्धेचे आयोजन करण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करत आहे.