मुंबई, 29 जानेवारी : आज आयसीसीच्या अंडर 19 महिला टी 20 वर्ल्ड कपचा अंतिम सामना पारपडला. या सामन्यात भारताने इंग्लंडवर दमदार विजय मिळवत पहिल्या अंडर 19 महिला वर्ल्ड कपवर आपलं नाव कोरलं आहे. कर्णधार शफाली वर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय महिला संघाने हा करिष्मा करून ऐतिहासिक विजय मिळवला आहे.
दक्षिण आफ्रिकेत आयसीसीच्या अंडर 19 महिला वर्ल्ड कप स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. यात भारतीय संघ सुरुवातीपासूनच प्रभावी ठरला. ग्रुप सामने आणि सुपर सिक्समध्ये केलेल्या अव्वल दर्जाच्या कामगिरीनंतर भारताने सेमी फायनल सामन्यातही न्यूझीलंडचा 8 विकेट्सने धुव्वा उडवला. त्यानंतर आज झालेल्या अंतिम सामन्यातही भारताने आपले वर्चस्व कायम ठेवले.
अंडर 19 महिला वर्ल्ड कपच्या अंतिम सामन्यात भारताने सुरुवातीला नाणेफेक जिंकली. कर्णधार शफाली वर्मा यांनी नाणेफेक जिंकल्यावर गोलंदाजीचा निर्णय घेतला. कर्णधाराचा हा निर्णय भारताच्या गोलंदाजांनी अतिशय खरा ठरवला आणि इंग्लंडच्या संपूर्ण संघाला 17 ओव्हरमध्ये सर्वबाद केले. यात भारताच्या गोलंदाज तितास साधू, पार्श्वि चोप्रा आणि अर्चना देवी यांनी प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या. तर कर्णधार शफाली वर्मा, सोनम यादव आणि मन्नत कश्यप यांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली.
हे ही वाचा : Under 19 WC : मुलीची फायनल मॅच पाहण्यासाठी आईने एक एक पैसा जोडून खरेदी केला इन्व्हर्टर
इंग्लंडने भारतासमोर वर्ल्ड कप विजयासाठी 20 ओव्हरमध्ये 69 धावांचे आव्हान ठेवले. हे आव्हान भारताने लीलया पेलले आणि अवघ्या 13 ओव्हरमध्ये इंग्लंडने दिलेले 69 धावांचे आव्हान पूर्ण केले. भारतीय संघाने हा सामना 7 विकेट्सने जिंकला.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Cricket, Cricket news, India vs england, Indian women's team, T20 cricket