IND vs ENG : 'बकवास बंद करा', टीम इंडियाच्या विजयानंतर भारतीय चाहत्यांवर भडकला एबी डिव्हिलियर्स
IND vs ENG : 'बकवास बंद करा', टीम इंडियाच्या विजयानंतर भारतीय चाहत्यांवर भडकला एबी डिव्हिलियर्स
इंग्लंडविरुद्धच्या चौथ्या टेस्टमध्ये टीम इंडियाचा (India vs England 4th Test) 157 रननी दणदणीत विजय झाला. पण दक्षिण आफ्रिकेचा माजी कर्णधार एबी डिव्हिलियर्स (Ab De Villiers) याने भारतीय चाहत्यांना सुनावलं आहे.
दुबई, 7 नोव्हेंबर : इंग्लंडविरुद्धच्या चौथ्या टेस्टमध्ये टीम इंडियाचा (India vs England 4th Test) 157 रननी दणदणीत विजय झाला. या विजयासोबतच भारताने या सीरिजमध्ये 2-1 ने आघाडी घेतली आहे. या मॅचमध्ये भारताचा विजय झाला असला तरी अनेक चाहत्यांना टेस्ट क्रिकेट क्रमवारीतला दुसऱ्या क्रमांकाचा बॉलर असलेल्या अश्विनला (R Ashwin) न खेळवणं पटलेलं नाही. अनेकांनी याबाबत विराट कोहलीवर (Virat Kohli) टीकाही केली आहे. पण दक्षिण आफ्रिकेचा माजी कर्णधार एबी डिव्हिलियर्स (Ab De Villiers) याने या मुद्द्यावरून भारतीय चाहत्यांना सुनावलं आहे. टीम सिलेक्शन आणि बाकीचा बकवास बंद करून खेळाची प्रशंसा करा, असं एबी म्हणाला आहे.
इंग्लंड दौऱ्यामध्ये भारतीय टीम 4 फास्ट बॉलर आणि एक स्पिनर घेऊन खेळत आहे. विराटने चार टेस्टमध्ये अश्विनऐवजी रविंद्र जडेजावर (Ravindra Jadeja) विश्वास दाखवला आहे. विराट कोहलीचा हा निर्णय योग्य ठरला. यानंतर एबी डिव्हिलियर्सने एक ट्वीट केलं. 'टीम निवड आणि इतर बकवास गोष्टींचा विचार करणं सोडून द्या. प्रतिस्पर्धा, जुनून, कौशल्य आणि देशभक्तीची प्रशंसा करा. जे तुमच्या डोळ्यासमोर आहे. तुम्ही एक चांगली मॅच बघण्यापासून वंचित राहत आहात,' असं ट्वीट एबी डिव्हिलियर्सने केलं.
Well played India, well Captained @imVkohli and amazing skill and guts from a few individuals. Also well played @root66 & England! Great ad for our beautiful game! Excited for the finale
'भारताची शानदार कामगिरी. विराटचं जबरदस्त नेतृत्व आणि काही खेळाडूंनी उत्कृष्ट कामगिरी केली. जो रूटच्या इंग्लंडनेही चांगला खेळ केला. क्रिकेटचा चांगला प्रचार झाला. फायनलसाठी रोमांचित आहे,' असं एबी डिव्हिलियर्स म्हणाला.
एबी डिव्हिलियर्स आयपीएलच्या दुसऱ्या राऊंडसाठी युएईला रवाना झाला आहे. तो आयपीएलमध्ये विराट कोहलीच्या आरसीबीकडून खेळतो. आरसीबीकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या व्हिडिओमध्ये एबीने पुनरागमन करून चांगलं वाटत आहे, असं सांगितलं. काही खेळाडू इंग्लंडमध्ये आहेत, पण ते लवकरच परत येतील. आमची सुरुवात चांगली झाली होती, हीच लय कायम ठेवण्याचा प्रयत्न करू, असं वक्तव्य एबीने केलं.
यंदाच्या आयपीएलमध्ये आरसीबी 7 मॅचमध्ये 10 पॉईंट्ससह तिसऱ्या क्रमांकावर आहे. आरसीबीचा पहिला सामना 20 सप्टेंबरला कोलकात्याविरुद्ध होणार आहे. 19 सप्टेंबरपासून आयपीएलच्या दुसऱ्या राऊंडला सुरुवात होणार आहे.