बर्मिंघम, 5 जुलै : इंग्लंडविरुद्धच्या पाचव्या टेस्टमध्ये टीम इंडियाचा (India vs England 5th Test) दारूण पराभव झाला आहे. भारताने दिलेलं 378 रनचं अशक्य वाटणारं आव्हान इंग्लंडने फक्त 3 विकेट गमावून पार केलं. जो रूट (Joe Root) आणि जॉनी बेयरस्टो (Jonny Bairstow) हे इंग्लंडच्या या विजयाचे शिल्पकार ठरले. जो रूटने नाबाद 142 तर बेयरस्टोने नाबाद 114 रनची खेळी केली. याआधी जॉनी बेयरस्टोने पहिल्या इनिंगमध्येही शतक केलं होतं. मॅचच्या चौथ्या दिवशी एलेक्स लिस आणि जॅक क्राऊली यांच्यात 107 रनची ओपनिंग पार्टनरशीप झाली, यानंतर भारताला लागोपाठ तीन विकेट मिळाल्या, त्यानंतर मात्र बॉलर्सना एकही विकेट घेता आली नाही. इंग्लंडने या विजयासोबतच 5 टेस्ट मॅचची ही सीरिज 2-2 ने बरोबरीत सोडवली, एक टेस्ट मॅच ड्रॉ झाली होती. भारताच्या या पराभवाचं कारण ठरला तो हनुमा विहारी (Hanuma Vihari). मॅचच्या चौथ्या दिवशी विहारीने जॉनी बेयरस्टोचा सोपा कॅच सोडला. इंग्लंडची दुसऱ्या इनिंगमध्ये बॅटिंग सुरू असताना 38व्या ओव्हरमध्ये मोहम्मद सिराजच्या (Mohammad Siraj) बॉलिंगवर बेयरस्टोच्या बॅटच्या एजला बॉल लागला. हा बॉल स्लिपमध्ये उभ्या असलेल्या हनुमा विहारीच्या दिशेने गेला, पण त्याच्या हातातून हा कॅच निसटला.
विहारीच्या हातातून फक्त कॅचच सुटला नाही तर बेयरस्टोला फोरही मिळाली. विहारीच्या या खराब फिल्डिंगमुळे मोहम्मद सिराजही नाराज दिसला. विहारीने कॅच सोडला तेव्हा बेयरस्टो फक्त 14 रनवर खेळत होता. त्यावेळी भारताला विकेट मिळाली, असती तर कदाचित मॅचचं चित्र वेगळं दिसलं असतं. हनुमा विहारीने या सामन्यात बॅटिंगमध्येही निराशा केली. रोहित शर्माला कोरोना झाल्यामुळे चेतेश्वर पुजारा शुभमन गिलसोबत ओपनिंगला खेळला, तर विहारीला तिसऱ्या क्रमांकावर पाठवण्यात आलं, पण पहिल्या इनिंगमध्ये तो 20 आणि दुसऱ्या इनिंगमध्ये 11 रनवर आऊट झाला.

)







