मॅनचेस्टर, 10 सप्टेंबर : भारत आणि इंग्लंड यांच्यातली पाचवी टेस्ट (India vs England 5th Test) कोरोनाच्या भीतीमुळे रद्द करण्यात आली. चौथ्या टेस्टदरम्यान टीमचे हेड कोच रवी शास्त्री (Ravi Shastri), बॉलिंग कोच भरत अरुण (Bharat Arun) आणि फिल्डिंग कोच आर.श्रीधर (R Sridhar) यांची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली होती. यानंतर पाचव्या टेस्टच्या एक दिवस आधी टीमचे फिजियो योगेश परमार (Yogesh Parmar) यांनाही कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं, त्यामुळे भारतीय खेळाडूंचा सराव रद्द करण्यात आला. यानंतर टॉसच्या तीन तास आधी मॅचही रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. टीम इंडियाचा माजी क्रिकेटपटू दिनेश कार्तिक (Dinesh Karthik) याने पडद्यामागे नेमकं काय घडलं, याबाबत सविस्तर माहिती दिली.
'योगेश परमारची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर खेळाडू घाबरले होते. मी काही भारतीय खेळाडूंशी बोललो. सीरिजच्या सगळ्या टेस्ट शेवटच्या दिवसापर्यंत खेळवल्या गेल्या. सगळेच खेळाडू थकले होते आणि टीमकडे फक्त एकच फिजियो होता. कोचिंग स्टाफला कोरोना झाला, मुख्य फिजियो नितीन पटेल हे त्यांच्या संपर्कात आल्यामुळे त्यांनाही क्वारंटाईन व्हावं लागलं. यानंतर टीमकडे एकच फिजियो होता, त्यालाही कोरोनाची लागण झाली, त्यामुळे टीमसमोर मोठी अडचण निर्माण झाली,' असं कार्तिक स्काय स्पोर्ट्सशी बोलताना म्हणाला.
'जर कोणी दुसरा असता, तुम्हाला लॉजिस्टिक्सची मदत लागली असती तर चाललं असतं. हे एवढं भीतीदायक झालं नसतं, पण जेव्हा फिजियोलाच कोरोना झाला तेव्हा गोष्टी जास्त भीतीदायक झाल्या,' अशी प्रतिक्रिया कार्तिकने दिली. या सीरिजचं आयोजन कठोर बायो-बबलमध्ये केलं गेलं नव्हतं, पण खेळाडूंना युएईमध्ये जायच्याआधी पाचव्या टेस्टवेळी बायो-बबलमध्ये राहायला सांगण्यात आलं होतं. खेळाडू इंग्लंडच्या बायो-बबलमधून युएईच्या बायो-बबलमध्ये जाणार होते.
'ही सीरिज संपल्यानंतर खेळाडूंना आयपीएलचं बायो-बबल आणि मग टी-20 वर्ल्ड कपच्या बायो-बबलमध्ये राहायचं होतं. यानंतर न्यूझीलंडची सीरिज होणार आहे. या सगळ्या स्पर्धांमध्ये एक आठवड्याचा कालावधी आहे. भारतीय खेळाडू किती दिवस बायो-बबलमध्ये राहतील? इंग्लंडला रवाना होण्यासाठी खेळाडू 16 मे रोजी भारतात एकत्र आले होते. जवळपास 4 महिने झाले आहेत. हा कालावधी खूप जास्त आहे,' असं वक्तव्य कार्तिकने केलं.
'फिजियोला कोरोनाची लागण झाल्यानंतर खेळाडू मानसिकदृष्ट्या अडचणीत आले. सीरिजची निर्णायक मॅच खेळवण्याचा कोणताही मार्ग नव्हता. जर मॅचच्या तिसऱ्या दिवशी एखादा खेळाडू कोरोना पॉझिटिव्ह आला असता, तर काय? यामुळे सगळे खेळाडू धोक्यात आले असते. त्यांना कमीत कमी 10 दिवस क्वारंटाईन व्हावं लागलं असतं. मग आयपीएलचं काय झालं असतं? आज खेळाडू निगेटिव्ह आला, तरी दोन दिवसांनी त्याची टेस्ट निगेटिव्हच येईल असं नाही. एखाद्या खेळाडूची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली असती, तर गोष्टी बदलल्या असत्या,' असं कार्तिक म्हणाला.
भारतीय खेळाडूंना आयपीएलमध्ये कोरोना घेऊन जाण्याची भीती आहे का? असा प्रश्नही कार्तिकला विचारण्यात आला, तेव्हा त्याने याला हो असं उत्तर दिलं. 'तुम्हाला हे समजून घ्यावं लागेल, आयपीएल खेळाडू आधीच क्वारंटाईन झाले आहेत. भारतीय टीम या टेस्टआधी कोणत्याही बायो-बबलमध्ये नव्हती. जर एखादा खेळाडू संक्रमित झाला असता तर गोष्टी बदलल्या असत्या. आपल्याला एका बायो-बबलमधून दुसऱ्या बायो-बबलमध्ये जायचं आहे, हे खेळाडूंना माहिती आहे,' असं कार्तिकने सांगितलं.
दिनेश कार्तिक हा इंग्लंडमध्ये स्काय स्पोर्ट्ससाठी कॉमेंट्री करत होता. आयपीएलसाठी तो तिसऱ्या टेस्टनंतरच युएईला रवाना झाला. कार्तिक आयपीएलमध्ये कोलकाता नाईट रायडर्सकडून खेळतो.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: India vs england