भारताच्या विजयी रथाला इंग्लंडने ब्रेक लावून आपल्या सेमीफायनलमध्ये पोहचण्याच्या आशा जिवंत ठेवल्या आहेत. या पराभवाने भारताचा सेमीफायनल प्रवेश लांबला आहे. भारताचे 11 गुण झाले असून गुणतक्त्यात दुसऱ्या स्थानावर आहे.
ICC Cricket world cup मध्ये ऑस्ट्रेलियायाने इंग्लंडपाठोपाठ न्यूझीलंडचा पराभव करून गुणतक्त्यात 14 गुणांसह पहिलं स्थान कायम राखलं आहे. ऑस्ट्रेलियाने सेमिफायनलला स्थान पक्कं केलं आहे. आता न्यूझीलंडची पुढची लढत इंग्लंडशी आहे.
न्यूझीलंड आणि भारत या दोन्ही संघांचे समान गुण आहेत. मात्र धावगतीच्या जोरावर भारताने दुसरा क्रमांक पटकावला. न्यूझीलंडचा एक सामना बाकी असून यात त्यांना विजय मिळवावा लागेल. तर भारताचे अजून दोन सामने बाकी आहेत. यातील एका सामन्यात विजय मिळवणं भारताला आवश्यक आहे.
न्यूझीलंडने आतापर्यंत 8 सामन्यात 5 विजयासह 11 गुण मिळवले आहेत. एका सामन्यात पावसाने खोडा घातला. त्यांचा पुढचा सामना इंग्लंडशी होणार आहे. यात पराभव झाल्यास इतर संघांच्या कामगिरीवर त्यांना अवलंबून रहावं लागेल. पाकिस्तानने पुढच्या सामन्यात विजय मिळवला तर त्यांचेही 11 गुण होतील. पण धावगतीच्या जोरावर न्यूझीलंड वरचढ ठरेल.
गतविजेत्या ऑस्ट्रेलियाने वर्ल्ड कपमध्ये फक्त एक सामना गमावला आहे. त्यांनी सेमीफायनलला जागा पक्की केली आहे. त्यांचा पुढचा सामना दक्षिण आफ्रिकेविरुद्ध आहे. आफ्रिका स्पर्धेतून बाहेर गेल्यामुळं या सामन्यातील निकालाचा कोणत्याच संघावर फरक पडणार नाही.
वर्ल्ड कपमध्ये भारताने 5 सामने जिंकले असून एक पराभव तर एक सामना पावसाने रद्द झाला. भारताचे 11 गुण झाले असून उर्वरित सामने बांगलादेश आणि श्रीलंकेशी होणार आहेत. यापैकी एक सामना जिंकला तर भारत सेमिफायनल गाठेल.
इंग्लंडने भारताविरुद्ध विजयासह 10 गुण मिळवून स्पर्धेतील आव्हान जिवंत ठेवलं आहे. त्यांचे 8 सामन्यात 5 विजय आणि 3 पराभव झाले आहेत. पुढचा सामना न्यूझीलंडशी असून त्यात विजय मिळवावाच लागेल. इंग्लंडला गेल्या 27 वर्षांत न्यूझीलंडविरुद्ध वर्ल्ड कपमध्ये एकही विजय मिळवता आलेला नाही. सेमीफायनलला पोहचण्यासाठी त्यांना किमान 12 गुण मिळवावे लागतील.
लंकेनं इंग्लंडला पराभूत करून 6 गुण मिळवत आपणही शर्यतीत असल्याचा इशारा दिला होता.मात्र दक्षिण आफ्रिकेनं त्यांच्या सेमीफायनलमधील आशा संपुष्टात आणल्या. आता त्यांचा सामना वेस्ट इंडिज आणि भारताशी आहेत.
पाकिस्तानची वर्ल्ड़ कपमधील कामगिरी चढ-उतारांनी भरलेली आहे. वेस्ट इंडिजकडून पराभव झाल्यानंतर त्यांनी इंग्लंडविरुद्ध विजय मिळवला. त्यानंतर ऑस्ट्रेलिया आणि भारताविरुद्ध पराभव झाल्यानंतर दक्षिण आफ्रिका, न्यूझीलंड आणि अफगाणिस्तानला पराभूत केलं. त्यांचा पुढचा सामना बांगलादेशशी होणार आहे. यात त्यांना विजय मिळवावा लागेल तरच ते सेमिफायनलला पोहचू शकतात. त्याशिवाय न्यूझीलंड आणि भारताचा पुढच्या सामन्यात विजय झाला तर पाकला संधी मिळेल.
वेस्ट इंडिज, अफगाणिस्तान आणि दक्षिण आफ्रिका आणि लंकेचं वर्ल्ड कपमधील आव्हान संपुष्टात आलं आहे. चौथ्या क्रमांकासाठी इंग्लंड, पाक आणि बांगलादेश यांच्यात स्पर्धा आहे.
वर्ल्ड कपची बाद फेरी 9 जुलैला सुरू होणार आहे. पहिली सेमीफायनल 9 जुलैला मँचेस्टरवर होईल. त्यानंतर दुसरा सामना 11 जुलैला होणार आहे. तर अंतिम सामना लॉर्ड्सवर 14 जुलैला होणार आहे.