मुंबई, 8 जून : वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपची फायनल (World Test Championship Final) आता अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. 18-22 जूनमध्ये भारत-न्यूझीलंड (India vs New Zealand) यांच्यात हा महामुकाबला रंगेल, त्याआधी आयसीसीने (ICC) क्रिकेट इतिहासातल्या सर्वोत्तम टेस्ट सीरिजची घोषणा केली आहे. यासाठी आयसीसीने एकूण 16 टेस्ट सीरिजचा समावेश केला होता आणि चाहत्यांना त्यांचं मत द्यायला सांगितलं होतं. आयसीसीच्या या पोलला 70 लाखांपेक्षा जास्त जणांनी मतं दिली. यानंतर भारत-ऑस्ट्रेलिया (India vs Australia) यांच्यात झालेली बॉर्डर-गावसकर ट्रॉफी 2020-2021 (Border Gavaskar Trophy) ही क्रिकेट इतिहासातली सर्वोत्तम टेस्ट सीरिज ठरली. या सीरिजमध्ये भारताचा 2-1 ने विजय झाला. ऍडलेडमध्ये झालेल्या पहिल्या टेस्टमध्ये भारताचा 36 रनवर ऑल आऊट झाला. टेस्ट क्रिकेटमधला टीम इंडियाचा हा सगळ्यात कमी स्कोअर होता. पहिल्या टेस्टमध्ये पराभव झाल्यानंतर टीम इंडियाच्या कर्णधार विराट कोहली पितृत्वाच्या रजेसाठी भारतात परतला. त्यामुळे अजिंक्य रहाणेकडे टीमचं नेतृत्व गेलं, यानंत भारतीय टीमने मागे वळून बघितलं नाही.
Ahead of the #WTC21 final, we set out to determine #TheUltimateTestSeries.
— ICC (@ICC) June 8, 2021
After 15 head-to-heads and over seven million votes across our social channels, we have a winner…
The 2020/21 Border-Gavaskar Trophy takes the crown 👑 pic.twitter.com/IvpjCxQ2eJ
मेलबर्नमध्ये झालेल्या दुसऱ्या टेस्टमध्ये अजिंक्य रहाणेने खणखणीत शतक झळकावलं आणि टीम इंडियाने सीरिजमध्ये पुनरागमन केलं. बॉक्सिंग डे टेस्टमध्ये भारताचा दणदणीत विजय झाला. पुढे सिडनीमधली तिसरी टेस्ट ड्रॉ करण्यात भारतीय टीमला यश आलं. शेवटच्या दिवशी हनुमा विहारी आणि आर.अश्विन यांनी दुखापत झालेली असूनही खिंड लढवली आणि ऑस्ट्रेलियाच्या तोंडचा विजयाचा घास हिरावून घेतला. ब्रिस्बेनमध्ये झालेल्या अखेरच्या टेस्ट मॅचमध्ये भारतीय टीमने इतिहास घडवला. ऋषभ पंतच्या वादळी खेळीमुळे भारताने शेवटच्या दिवशी अखेरच्या काही ओव्हर शिल्लक असताना रोमांचक विजय मिळवला. अनेक दिग्गज खेळाडूंना दुखापत झाल्यामुळे भारतीय टीम नवोदितांना घेऊन मैदानात उतरली होती, असं असलं तरी अजिंक्य सेनेने दिग्गज कांगारूंना धूळ चारली. लागोपाठ दुसऱ्यांदा भारताने ऑस्ट्रेलियाचा त्यांच्याच मायभूमीत टेस्ट सीरिजमध्ये पराभव केला.