ICC Cricket World Cup स्पर्धेचा महासंग्रामात आता चुरस वाढली आहे. सेमीफायनलला कोणते संघ पोहचतील याचाही अंदाज येऊ लागला आहे. भारताने आतापर्यंत वर्ल्ड कपमध्ये अपराजित राहत गुणतक्त्यात पहिल्या चारमध्ये आपले स्थान कायम राखलं आहे.
भारताने सहापैकी पाच सामने जिंकले असून एक सामना पावसामुळे रद्द झाला. भारत पुढचा सामना 30 जूनला इंग्लंडविरुद्ध खेळणार आहे. त्यानंतर बांगलादेश आणि लंकेविरुद्ध सामना होणार आहे.
दरम्यान भारत इंग्लंडविरुद्ध खेळताना वेगळ्या रंगाच्या जर्सीत खेळणार आहे. इंग्लंड आणि भारताच्या जर्सीचा रंग मिळताजुळता असल्याने एका संघाला सामन्यावेळी वेगळी जर्सी घालावी लागणार आहे.
इंग्लंडला त्यांच्याच जर्सीत खेळण्याची मुभा आहे. वर्ल्ड कपचे यजमानपद इंग्लंडकडे असून त्यांना आहे त्या जर्सीत खेळता येणार आहे. आतापर्यंत भारताने वर्ल्ड कप स्पर्धेत निळ्या रंगाची जर्सी घातली पण इंग्लंडचीही जर्सी निळ्या रंगाची असल्यामुळे भारताला जर्सीचा रंग बदलावा लागणार आहे.
भारताच्या या जर्सीचे अनावरण शुक्रवारी करण्यात आलं आहे. भगव्या रंगात असलेल्या जर्सीचा वापर इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात होणार आहे. भारताच्या या रंगातील जर्सीवरून राजकारणही झालं. यावर आयसीसीने उत्तर दिलं असून बीसीसीआयला आयसीसीने जर्सीचे रंग आणि डीझाईन पाठवलं होतं असं स्पष्ट केलं आहे.
टीम इंडियाच्या जर्सीचा रंग भगवा ठेवण्यामागे युवक आणि संघाच्या बेधडक वृत्तीची प्रेरणा असल्याचं आयसीसीने सांगितलं आहे. भारतीय संघ रविवारी होणाऱ्या इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात ही जर्सी घालून उतरेल.
आयसीसीचे जर्सीबाबत काही नियम आहेत. या नियमानुसार एकाच रंगाची जर्सी घालून दोन संघांना सामन्यात उतरता येत नाही. त्यासाठी एका संघाच्या जर्सीचा रंग बदलला जातो. फुटबॉलच्या सामन्यात या नियमाचा वापर केला जातो. त्याच धर्तीवर क्रिकेटमध्ये हा नियम आयसीसीने अवलंबला आहे.