मुंबई, 16 मार्च : टीम इंडियाचा ऑफ स्पिनर आर.अश्विन (R.Ashwin) याने ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडविरुद्धच्या सीरिजमध्ये धमाकेदार कामगिरी केली. या दोन्ही सीरिजमध्ये भारताचा विजय झाला, त्याचा प्रमुख शिल्पकार अश्विनच होता. पण इंग्लंडविरुद्धच्या (India vs England) चार टेस्ट मॅचच्या सीरिजमध्ये डीआरएसवरून (DRS) अश्विन आणि कर्णधार विराट कोहलीवर (Virat Kohli) टीका करण्यात आली. भविष्यात डीआरएस घेण्याची आपली क्षमता वाढवण्याचा प्रयत्न करू, असं अश्विन म्हणाला आहे. तसंच डीआरएसबाबतच्या चुकीच्या निर्णयात मी एकटा दोषी नाही. विकेट कीपर ऋषभ पंतने (Rishabh Pant) मला निराश केलं. पंतला एँगल आणि बाऊन्सचा योग्य अंदाज घेता आला नाही, त्यामुळे मला मदत मिळाली नाही, असं अश्विन म्हणाला.
इंडिया टुडेला अश्विनने मुलाखत दिली. 'डीआरएसला तुम्ही ज्या चष्म्यातून बघता तो बदलावा लागेल. इंग्लंडविरुद्धच्या सीरिजआधी माझी डीआरएस घेण्याची क्षमता चांगली होती. तुम्ही डीआरएस विकेट कीपरच्या सल्ल्यानेच घेता. आम्ही रवी शास्त्रींबरोबरही या गोष्टींची चर्चा करतो, त्यांचीही माझ्याबद्दल यावरून तक्रार आहे,' अशी प्रतिक्रिया अश्विनने दिली.
'मी डीआरएसमध्ये काही गोष्टी सुधारल्या तर याचा भविष्यात नक्कीच फायदा होईल,' असं अश्विनला वाटतं. एलबीडब्ल्यूसाठी अश्विन बरेच वेळा अपील करतो, यानंतर तो विराटला डीआरएस घ्यायला सांगतो, पण बरेच वेळा हा निर्णय चुकत असल्याचं इंग्लंडविरुद्धच्या सीरिजमध्ये दिसलं. धोनीच्या निवृत्तीनंतर मात्र भारताचं डीआरएस चुकण्याचं प्रमाणही वाढल्याचं प्रकर्शाने जाणवलं आहे.
अश्विनने इंग्लंडविरुद्धच्या 4 टेस्टमध्ये 14.72 च्या सरासरीने 32 विकेट घेतल्या. या सीरिजमध्ये अश्विनला 3 वेळा 5 पेक्षा जास्त विकेट घेण्यात यश आलं. तर चेन्नईतल्या दुसऱ्या टेस्टमध्ये त्याने शतक लगावलं, आणि भारताचा विजय झाला, त्यामुळे अश्विनला मॅन ऑफ द मॅच देण्यात आलं. भारताने ही सीरिज 3-1 ने जिंकली.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Cricket news, India vs england, R ashwin, Rishabh pant, Sports, Virat kohli