hreमुंबई, 11 जानेवारी: तब्बल सात वर्ष क्रिकेट मैदानाच्या बाहेर राहिलेला भारताचा आघाडीचा वेगवान गोलंदाज एस श्रीशांतने नुकतंच पुन्हा एकदा क्रिकेटमध्ये पदार्पण केलं आहे. आज मुबंईमध्ये झालेल्या सय्यद मुश्ताक अली टी -20 मध्ये सामन्यात प्रभावी कामगिरी केली. सय्यद मुश्ताक अली टी -20 या स्पर्धेत एस श्रीशांत केरळ संघाकडून खेळत असून आज मुबंईत पॉंडीचेरी विरुद्धच्या सामन्यात त्यानं एक विकेटही पटकावली आहे. तब्बल सात वर्षांनी त्यानं क्रिकेटच्या मैदानात पाऊल ठेवून ही कामगीरी केल्यानं अनेकांनी त्याचं कौतुक केलं आहे. श्रीशांत आता पुन्हा एकदा भारतीय संघात आपलं स्थान निर्माण करण्याची कठोर परिश्रम घेताना दिसत आहे. आज त्यानं घेतलेल्या विकेटनंतर जे सेलेब्रेशन केलं, यामुळं चाहत्यांना पुन्हा एकदा जुन्या श्रीशांतची आठवण आल्याचं अनेकांनी म्हटलं आहे. शिवाय त्यानं आपला स्पेल संपल्यानंतर स्टम्पला स्पर्श करत ‘धन्यवाद’ म्हटलं आहे. खरंतर हा क्षण समस्त श्रीशांतच्या चाहत्यांसाठी खूपच भावनिक होता. आता श्रीशांत पुन्हा एकदा भारतीय संघात स्थान मिळवण्यासाठी प्रयत्न करणार आहे.
मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर पॉंडेचेरीविरुद्धच्या चौथ्या षटकात फबिद अहमदची विकेट घेत त्यानं ही ऐतिहासिक कामगिरी केली आहे. ही विकेट घेतल्यानंतर श्रीशांतच्या एका चाहत्यानं ट्वीटरवर म्हटलं की, वेळ काळ बदलला आहे, पण त्याचं क्रिकेटबद्दलचं प्रेम आणि आवड अद्याप कायम आहे. 2013 मध्ये श्रीशांतवर बंदी घातली होती स्पॉटफिक्सिंगप्रकरणी 37 वर्षीय श्रीशांतवर ऑगस्ट 2013 मध्ये बंदी घालण्यात आली होती. श्रीशांतसोबतच राजस्थान रॉयल्सचा त्याचा सहकारी अजित चंडिला आणि अंकित चव्हाण यांच्यावरही बंदी घालण्यात आली होती. न्यायमुर्ती जैन यांनी श्रीशांत वरील बंदीचा कालावधी कमी केला होता. त्यामुळे श्रीशांत आज मैदानात खेळू शकला आहे. श्रीशांतवरील बंदी कमी करण्यामागील कारण सांगताना न्यायमुर्ती जैन म्हणाले होते की, श्रीशांतचं वय आता तिशीपलीकडे गेलं आहे. त्यामुळं त्याचा क्रिकेटपटू म्हणून उच्च कामगिरी करण्याचा काळ आता संपुष्टात आला आहे.