नवी दिल्ली, 28 जानेवारी : शेकडो वर्षांच्या संघर्षानंतर श्रीराम भक्तांची प्रतीक्षा आता संपणार आहे. प्रभू श्रीरामाची नगरी असलेल्या अयोध्येतल्या राम मंदिराचं बांधकाम लवकरच पूर्ण होणार आहे. ट्रस्टच्या म्हणण्यानुसार मंदिराचं 65 टक्के काम पूर्ण झालंय.
राजस्थानमधल्या बन्सी पहारपूरच्या गुलाबी (पिंक) दगडापासून बनवल्या जाणार्या गर्भगृहाचे बांधकाम डिसेंबर 2023मध्ये पूर्ण होईल. सध्या या मंदिर उभारणीचं काम युद्धपातळीवर सुरू आहे. मंदिराच्या तळमजल्यावर गर्भगृह, नृत्य मंडप, रंगमंडप याशिवाय गर्भगृहाच्या उत्तर व दक्षिण दिशेला कीर्तन मंडप बनविण्याचं काम सुरू झालंय. पुढच्या वर्षी मकर संक्रांतीच्या दिवशी प्रभू श्रीराम अयोध्येतल्या राम मंदिराच्या भव्य गर्भगृहात विराजमान होतील.
11 महिन्यांनंतर भाविकांची प्रतीक्षा संपेल
श्री रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टचे सरचिटणीस चंपतराय यांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘बरोबर 11 महिन्यांनी सूर्य उत्तरायणात येईल, तेव्हा वसंत पंचमीच्या मकर संक्रांतीच्या पर्वावर रामभक्तांची प्रतीक्षा संपेल. म्हणजेच आतापासून 11 महिन्यांनंतर प्रभू श्रीराम गर्भगृहात विराजमान होतील. 2024मध्ये जेव्हा सूर्य उत्तरायणात प्रवेश करेल, तेव्हा म्हणजेच 1 जानेवारी 2024 पासून येथे प्राणप्रतिष्ठा उत्सव सुरू होईल.’
अयोध्येतल्या श्रीराम मंदिराचे मुख्य पुजारी आचार्य सत्येंद्र दास म्हणाले की, ‘भव्य श्रीराम मंदिर निर्माण होण्यापूर्वीचं तात्पुरत्या मंदिरातलं यंदाचं शेवटचं वर्ष अनेक उत्सवांचं आहे. कारण पुढच्या मकर संक्रांतीनंतर प्रभू श्रीराम भव्य मंदिरात विराजमान होणार, हे निश्चित आहे. त्यामुळे या वर्षी होणारे सर्व उत्सव हे सध्या अस्तित्वात असणाऱ्या मंदिरातले शेवटचे उत्सव असतील. या वर्षात येणारी होळी, रामनवमी, झुलोत्सवासोबतच दिवाळी येथे साजरी होणार आहे. पण पुढच्या वर्षीच्या संक्रांतीसह जे काही सण येतील, ते भव्य राम मंदिरातच होतील. श्रीराम जेव्हा नवीन राम मंदिरात विराजमान होतील, तेव्हा सर्व उत्सव अगदी 500 वर्षांपूर्वी ज्या पद्धतीनं साजरे केले जात होते, त्याच उत्सवांसारखे होतील.’
हे वाचा - जया एकादशीचं महत्त्व काय; व्रत करणाऱ्याला मिळतं अश्वमेध यज्ञ करण्यासारखं पुण्य
रामभक्त जिंकले
मुख्य पुजारी आचार्य सत्येंद्र दास सांगतात की, ‘अयोध्येत निर्माण होत असलेल्या भव्य राम मंदिरात जेव्हा प्रभू श्रीरामांची प्राणप्रतिष्ठा होईल, तो क्षण आनंदाचा असेल. तो क्षण पाहून भक्त शेकडो वर्षांचा संघर्ष विसरतील. हा 495 वर्षांच्या संघर्षाचा विजय आहे. सर्व उलथापालथ आणि बदलानंतर आता ती वेळ आली आहे. 23 डिसेंबर 1949 रोजी प्रभू श्रीराम अयोध्येतल्या वादग्रस्त संरचनेत असताना उत्सव साजरा करण्यात आला. त्यानंतर ती वादग्रस्त संरचना (बाबरी मशीद) 6 डिसेंबर 1992 रोजी पाडण्यात आली. त्यानंतर प्रभू श्रीरामांची मूर्ती 28 वर्षं त्रिपालमध्ये होती व तिथेच उत्सव आयोजित करण्यात येत होता. आता अयोध्येत जिथे प्रभू श्रीरामांची मूर्ती गेल्या 30 वर्षांपासून आहे, तिथे सर्व सुविधा आहेत; पण तिथलं मंदिर तात्पुरतं आहे. तिथेही उत्सव साजरा केला जातो. परंतु यंदा येथे साजरे होणारे उत्सव शेवटचे ठरतील व पुढच्या वर्षी भव्य राममंदिरात उत्सव होतील.’
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.