प्रियांका माळी, प्रतिनिधी पुणे, 14 जून : दरवर्षी येणारी आषाढीची वारी म्हणजे भक्तीचा भव्यदिव्य सोहळाच असतो. यंदाही ‘ज्ञानोबा-तुकाराम’ अशा जयघोषात वारी अतिशय उत्साहात पंढरीला निघाली आहे. विठ्ठलाची भक्ती गीते, नृत्य, टाळ नाद अशा गोष्टींसोबतच वारीचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे वारीमध्ये वारकऱ्यांच्या सेवेसाठी आणि आनंदासाठी सादर केले जाणारे वेगवेगळे उपक्रम याच धरतीवर यंदाच्या वारीमध्ये वारकऱ्यांसाठी नुकतेच बाशिंग या नाटकाचं मोफत आयोजन करण्यात आले होते. प्रबोधन करण्यासोबत एक वेगळा विचार देणाऱ्या या नाटकाला वारकऱ्यांनी मोठी पसंती दर्शविली आहे. अनेक वारकऱ्यांनी पहिल्यांदा पाहिलं नाटक सध्या मुलींच्या अपेक्षा बदलल्यामुळे शेतकरी मुलांना लग्न करताना येणाऱ्या अडचणी हा विषय बाशिंग या नाटकामध्ये हाताळला आहे. वारकऱ्यांना त्यांच्याच अवतीभवती असलेल्या गोष्टींचं दर्शन घडवणारं हे नाटक असल्यामुळे ते त्यांना विशेष भावलं. नाटकाचे कथानक शेतकरी कुटुंबाभोवती फिरते. पूर्वी शेतीला मोठी प्रतिष्ठा प्राप्त होती. परंतु आजच्या काळात शेती व्यवसाय हा आव्हानात्मक झाला असून तो कमी प्रतिष्ठित समजला जात आहे.
शेतकऱ्याच्या मुलीने आपल्या वडिलांचे काबाडकष्ट आणि शेतीमुळे कुटुंबाची होत असलेली वाताहात डोळ्यांनी बघितलेली असते. त्यामुळेच सध्या तिला शेतकरी नवरा नको आहे, असे या नाटकात दाखवले आहे. आणि त्यामुळेच शेतकऱ्यांची मुलं जर नोकरीला नसतील तर त्यांना मुलगी मिळणं कसं कठीण झालं आहे, हे अतिशय प्रत्ययकारी रित्या हे नाटक सांगतं. यासोबतच शेतकऱ्यांच्या मुलांची लग्न जमवण्यासाठी काही एजंट असतात आणि ते कशापद्धतीने पैशांची मागणी करून मुलांची फसवणूक करतात, या गंभीर विषयावरसुद्धा नाटकाने प्रकाश टाकला आहे. शेतकऱ्यांच्या समस्या सुटण्याऐवजी दिवसेंदिवस कशा वाढत आहेत, त्यात नवनवीन समस्यांची कशी भर पडत आहे याचं दर्शन घडवत बाशिंग हे नाटक पाहणाऱ्याला अंतर्मुख करून जातं. अनेक वारकऱ्यांनी पहिल्यांदा हे नाटक पाहिलं.
Ashadhi Wari 2023: ना कोणता रंग, ना धर्म, अशी असते वारी, एकतेचा संदेश देणारा खास Videoवारकऱ्यांसाठी सेवा देण्याचा प्रयत्न बाशिंग या नाटकाचा लेखक आणि दिग्दर्शक प्रमोद यादव यांनी सांगितले की, नाटकाचे बरेच प्रयोग झाले. हा विषय मला माझ्या गावाकडूनच समजला. शेतकरी मुलाला सहसा कोणी मुलगी देत नाही आणि दिली तरीही शेतकऱ्याची कशा प्रकारे फसवणूक होते, हे मी प्रत्यक्षात पाहिले आणि त्यामुळे नाटकाद्वारे हा विषय वारकऱ्यांसाठी महत्त्वाचा होईल असे वाटले. म्हणून वारकऱ्यांसाठी वेगळ्या स्वरूपात सेवा देण्याचा आम्ही प्रयत्न केला. नाटक पाहून एक वेगळा अनुभव आम्ही पहिल्यांदाच नाटकाचा अनुभव घेतला अतिशय महत्त्वाचा विषय नाटकातून मांडण्यात आला कशाप्रकारे शेतकऱ्याची फसवणूक केली जाते याची जाणीव आम्हाला झाली आणि पहिल्यांदाच नाटक पाहून एक वेगळा आणि चांगला अनुभव आला, असं वारकऱ्यांनी सांगितले.