चंद्रकांत फुंदे, प्रतिनिधी
पुणे, 28 मार्च : कसबा पेठच्या बालेकिल्ल्यात भाजपचा धक्कादायक पराभव झाला. पोटनिवडणुकीतल्या या भूकंपाच्या धक्क्याचे पडसाद आता भाजपमध्ये उमटायला सुरूवात झाली आहे. चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या विधानावर मुक्ता टिळक यांचे पूत्र आणि भाजपचे पदाधिकारी कुणाल टिळक यांनी उघड नाराजी व्यक्त केली आहे.
टिळक कुटुंबाचा मतदारांशी संपर्क तुटल्यानं कुणाल आणि शैलेश टिळकांना उमेदवारी नाकारल्याचं चंद्रकांत पाटील यांनी सांगितल्यानं वाद निर्माण झाला आहे. चंद्रकांत पाटलांनी केलेल्या या वक्तव्यावर मुक्ता टिळक यांचे पूत्र कुणाल टिळक यांनी नाराजी व्यक्त केली आहे. मुक्ता टिळक यांच्या पुण्यातील कामाला दुर्लक्षित करणं बरोबर नसल्याचं कुणाल टिळक यांनी म्हटलंय. गेल्या 50 वर्षांत टिळक कुटुंबानं पुण्यात जे काम केलं ते मतदार 2 महिन्यात कसं विसरणार, असा सवालही त्यांनी केलाय. येत्या निवडणुकीत होणारे बदल दिसतील, असं सूचक वक्तव्यही कुणाल टिळक यांनी केलंय.
काय म्हणाले होते चंद्रकांत पाटील?
मुक्ता टिळक यांच्या आजारपणामुळे टिळक कुटुंबाचा मतदारांशी राजकीय संपर्क तुटला होता, त्यामुळेच कसबा पोटनिवडणुकीत टिळक कुटुंबाबाहेर भाजपने उमेदवारी दिली, असा गौप्यस्फोट भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी केला आहे. न्यूज18 लोकमतच्या एक्सक्ल्यूझिव्ह मुलाखतीमध्ये चंद्रकांत पाटील यांनी अनेक विषयांवर आपली भूमिका मांडली आहे.
'ज्या घरातला माणूस जातो, त्या घरातल्या कुणालातरी तिकीट द्यावं लागतं. पण आजारपणामुळे मुक्ताताईंचं दिसणं, असणं, अस्तित्व हे संपलं होतं. त्यांचे पती आणि त्यांचा मुलगा यांना मुक्ताताईंच्या सेवेत इतका वेळ द्यावा लागला, त्यामुळे त्यांचा राजकीय आणि सामाजिक एक्जिस्टन्सही कमी झाला होता. मुक्ताताई चांगल्या कार्यकर्त्या होत्या, म्हणून त्या महापौर झाल्या, आमदारही झाल्या. त्यांचे पती सक्रीय आणि त्यांचा मुलगा आमचा पदाधिकारी, पण घरातल्या परिस्थितीमुळे त्यांचा एक्जिस्टन्स कमी झाला,' असं चंद्रकांत पाटील म्हणाले.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: BJP