

3 ऑगस्ट 2020 चा दिवस. नेव्हिगेशन ऑफिसर गौरव सिंह समुद्री जहाज MV अनास्तासियामधून चीनच्या कॅफीडीयन बंदरावर पोचले. ते ऑस्ट्रेलियाहून तिथं कोळसा घेऊन गेले होते. मात्र चीननं त्यांना तिथं कोळसा उतरवण्याची परवानगी दिली नाही. आता 6 महिने होतील. गौरव आणि जहाजावरचे इतर 15 भारतीयांसाठी जहाज जणू तुरूंग बनलंय. गौरवचं ऑक्टोबरमध्ये लग्न होणार होतं. पण ते घरी पोचू शकले नाही. MV अनास्तासियासोबतच अजून एक जहाज MV जग आनंद मध्येही 23 भारतीय अडकले आहेत.


गौरवनं news 18 ला सांगितलं, की जहाजात अडकलेले भारतीय खूप अस्वस्थ आहेत. त्यांना घरी परतायचं आहे. गौरव म्हणाला, की क्रूच्या कर्मचाऱ्यांचा यात काही दोष नाही पण त्यांना शिक्षा मिळते आहे. अधिकतर कर्मचारी 50 ते 60 या वयोगटातील आहेत. त्यांना कसलीच वैद्यकीय सुविधाही मिळत नाही. काही नाविकांना दुषित पाण्यामुळं संसर्गही झालाय. एकानं तर आत्महत्येचाही प्रयत्न केला. एकूण 74 जहाजं इथं अडकलीत आणि शेकडो भारतीय त्यात आहेत.


चीनच्या हेकेखोर मनमानीमुळे 74 समुद्री जहाजं चीनच्या बंदरावर अडकून पडलीत. त्यांना जहाजावरून माल खाली उतरवण्याची किंवा बंदरावरून परतण्याचीही परवानगी नाहीय. चीन आणि ऑस्ट्रेलियाच्या दरम्यान सध्या तणाव आहे. चीननं औपचारिक स्वरूपात 12 डिसेंबरला ऑस्ट्रेलियाकडून येणाऱ्या कोळशावर बंदी घातली आहे. या जहाजांनाही कित्येक महिन्यापासून कोळसा खाली उतरवण्याची परवानगी मिळत नाही असं चित्र आहे.


या सगळ्या प्रकरणाबाबत विदेश मंत्रालयानं चीनच्या शासनाला लवकर तोडगा काढण्याची विनंती केली आहे. MEA चे प्रवक्ते अनुराग श्रीवास्तव यांनी नुकतंच वक्तव्य केलं होतंं, की चीन कोविडमुळे ही परवानगी देत नाही आहे. मात्र इतर जहाजांबाबत चीन असं वागताना दिसत नाही.