महाराष्ट्रातील किल्ल्यांचा विचार केल्यानंतर पश्चिम महाराष्ट्रातील किल्ल्यांचा विचार प्रामुख्यानं येतो. विदर्भातही अनेक ऐतिहासिक किल्ले आहेत. त्याबाबत अनेकांना फारशी माहिती नाही. महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने तुम्हीही या किल्ल्यांना नक्की भेट द्या.
किल्ले बाळापूर : अकोल्यापासून 25 किमी वर मान व म्हैस नद्यांच्या संगमावर बाळापूर गाव वसलेले आहे. गावात शिरताच हा किल्ला लक्ष वेधून घेतो. मुघलांनी बांधलेल्या या किल्ल्याचे बांधकाम अजूनही सु स्थितीत शाबूत आहे. किल्ल्याला बाहेरच्या तटबंदीत दोन आणि आतल्या तटबंदीत एक असे एकूण चार दरवाजे आहेत. त्यावर मुघलकालीन नक्षीकाम पाहायला मिळते.
चंद्रपूररोडवरील भद्रावती येथे प्राचीन भक्कम बांधणीचा भांदक हा भुईकोट किल्ला आहे.गडाचे प्रवेशद्वार आजही भक्कम स्थितीमध्ये आहे. काही जण याला भद्रावतीचा किल्ला म्हणूनही ओळखतात.
श्रीरामाच्या पदस्पर्शानं पावन झालेले रामटेक गडमंदिर हे सर्वांचं श्रद्धास्थान आहे. हे गडमंदिर हे भक्कम दुर्ग म्हणूनही महत्त्वाचे आहे.मटेकच्या पायथ्याशी असलेले अंबाला सरोवर पुराण काळापासून धर्मक्षेत्र म्हणून प्रसिध्द आहे. कालिदासांना त्यांचे मेघदूत हे काव्य याच डोंगरावर सुचले अशी आख्यायिका आहे
नगरधन किल्ला : रामटेक गडमंदिरापासून अवघ्या 8 कि.मी अंतरावर असलेल्या नगरधन या गावी भक्कम बांधणीचा एक भुईकोट किल्ला आहे. नव्याने केलेल्या डागडुजीमुळे हा किल्ला आजही सुस्थितीमध्ये आहे.
नरनाळा : अकोल्यापासून सुमारे 66 कि.मी सातपुड्याच्या अभ्ययारण्यात हा किल्ला आहे. नरनाळा हा महाराष्ट्रातील गिरिदुर्गांमधे सगळ्यात जास्त विस्तार असलेला गड आहे. या किल्ल्याला छोटे मोठे मिळुन 22 दरवाजे आहेत. असंख्य बुरुजांची मालिका या किल्ल्याचे खरे सौंदर्य आहे.
चिखलदरा हे विर्दभातील महाबळेश्वर म्हणून प्रसिध्द आहे. थंड हवेचे ठिकाण म्हणून दरवर्षी लाखो पर्यटक येथे येत असतात.चिखलदरा गावापासून अवघ्या 3 किमी अंतरावर गाविलगड किल्ला आहे. संपूर्ण किल्ला दोन भागात विभागलेला असून संपूर्ण किल्ला पहाण्यासाठी किमान एक अख्खा दिवस लागतो.