पावसाळा सुरु झालाय. एकीकडे पावसाळा अनेकांना रोमँटिक वाटतो, तर दुसरीकडे शहरातील महामार्गांवरून प्रवास करताना सर्वसामान्यांच्या मनस्तापाला सीमा उरत नाही.
विशेषतः स्कूटर आणि मोटारसायकलस्वारांना पावसाळ्यात अनंत अडचणींचा सामना करावा लागतो. पावसाळ्यामध्ये अपघातांचं प्रमाण खूप वाढते. अपघात टाळण्यासाठी काही गोष्टींची खबरदारी घेणं खूप महत्त्वाचं आहे.
पावसाळ्यात दुचाकीस्वारांनी आपल्या दुचाकीच्या टायरवर लक्ष द्यायला हवं. टायर खराब असल्यास अपघाताचा धोका असतो. त्यामुळे टायर खराब असल्यास ताबडतोब बदलून घ्या आणि नियमितपणे हवा तपासा.
पावसाळ्यात रस्त्यावरील पाण्यामुळे खड्डे लक्षात न आल्यामुळे अपघाताचा धोका वाढतो. त्यामुळं तुम्ही कितीही घाईत असला तरी गाडी सावकाश आणि काळजीपूर्वक चालवा. शिवाय पावसाळ्यात दृश्यमानता कमी होते, त्यामुळे आपल्या समोरच्या गाडीपासून सुरक्षित अंतर ठेवून गाडी चालवा. असं केल्याने अपघाताची शक्यता कमी होते.
पाण्याने तुंबलेल्या रस्त्यांवरून जाणं टाळा. पाण्याखाली गेलेला रस्ता हा अपघाताचा सापळा ठरू शकतो. त्यामुळे दुचाकीने प्रवास सुरू करण्यापूर्वी, कोणत्या मार्गाने प्रवास करायचा आणि कोणते मार्ग टाळायचे याचाही विचार जरूर करा.