आयपीएल 2021 (IPL 2021) संपल्यानंतर लगेचच टी-20 वर्ल्ड कपला (T20 World Cup) सुरुवात होणार आहे. वर्ल्ड कपसाठी टीम इंडियामध्ये चार स्पिनर आणि तीन फास्ट बॉलरना संधी देण्यात आली आहे. यामध्ये जसप्रीत बुमराह, अक्षर पटेल, मोहम्मद शमी आणि वरुण चक्रवर्ती यांचा समावेश आहे.
मुंबई इंडियन्सचा फास्ट बॉलर जसप्रीत बुमराह (Jaspirt Bumrah) याने या मोसमात 13 मॅचमध्ये 19 विकेट घेतल्या आहेत. सर्वाधिक विकेट घेणाऱ्या खेळाडूंच्या यादीत बुमराह तिसऱ्या क्रमांकावर आहे. त्याने इंग्लंड दौऱ्यातल्या टेस्ट सीरिजमध्येही शानदार कामगिरी केली होती.
पंजाब किंग्ससाठी आयपीएलचा हा मोसम फारसा चांगला राहिला नाही, तरी मोहम्मद शमी (Mohmmad Shami) उत्कृष्ट बॉलिंग करत आहे. त्याने 13 मॅचमध्ये 18 विकेट घेतल्या आहेत. आयपीएलच्या या मोसमात शमी प्रत्येक 16 व्या बॉलला विकेट घेत आहे.
दिल्ली कॅपिटल्सची टीम यंदाच्या पॉईंट्स टेबलमध्ये पहिल्या क्रमांकावर आहे, तसंच त्यांनी प्ले-ऑफमध्येही प्रवेश मिळवला आहे. दिल्लीच्या अक्षर पटेलने (Axar Patel) 9 सामन्यांमध्ये 14 विकेट घेतल्या आहेत. त्याने फक्त 6.05 च्या इकोनॉमी रेटने बॉलिंग केली आहे.
वरुण चक्रवर्तीने (Varun Chakravarthy) या आयपीएलमध्ये 15 विकेट घेतल्या आहेत. या मिस्ट्री स्पिनरला युएईमधल्या खेळपट्टीवर मागच्या 28 आयपीएल सामन्यांमध्ये 32 विकेट मिळाल्या आहेत, त्यामुळे वर्ल्ड कपमध्ये तो भारतासाठी हुकमी एक्का ठरू शकतो. वरुण चक्रवर्तीचा इकोनॉमी रेट 6.73 आहे.
आर. अश्विनला (R Ashwin) टीममध्ये ऑफ स्पिनर म्हणून स्थान देण्यात आलं आहे. दिल्ली कॅपिटल्सच्या या बॉलरला यंदाच्या आयपीएलमध्ये फारशी चमकदार कामगिरी करता आलेली नाही. आयपीएलच्या दुसऱ्या राऊंडमध्ये अश्विनने 5 सामन्यांमध्ये फक्त 4 विकेट घेतल्या आहेत. फॉर्मच्या हिशोबाने बुमराह, शमी, अक्षर आणि वरुण यांचं वर्ल्ड कपमध्ये खेळणं निश्चित मानलं जात आहे, त्यामुळे अश्विनला प्लेईंग इलेव्हनमधून बाहेर ठेवलं जाऊ शकतं.
रवींद्र जडेजा (Ravindra Jadeja) ऑलराऊंडर म्हणून टीममध्ये असेल, तसंच तो पाचव्या बॉलरची भूमिका निभावू शकतो. आयपीएलच्या 13 सामन्यांमध्ये त्याने 10 विकेट मिळवल्या आहेत. त्याचा इकोनॉमी रेटही वरुण आणि अक्षरप्रमाणे 7 पेक्षा कमी आहे.
टीम इंडियामध्ये निवड झालेले राहुल चहर (Rahul Chahar) आणि भुवनेश्वर कुमारही (Bhuvneshwar Kumar) फॉर्ममध्ये नाहीत. चहरने आयपीएलच्या दुसऱ्या राऊंडमध्ये 4 मॅच खेळून 2 विकेट मिळवल्या. खराब फॉर्ममुळे त्याला मुंबईने टीमबाहेरही बसवलं आहे. तर भुवनेश्वर कुमारने या मोसमात 10 मॅचमध्ये फक्त 5 विकेट घेतल्या आहेत.