भारतीय क्रिकेट संघाचे लक्ष सध्या ऑस्ट्रेलियात होणारा आयसीसी टी-20 वर्ल्ड कप आहे. त्यामुळं संघात युवा खेळाडूंना जास्त संधी दिल्या जात आहे.
विराट कोहली सध्या टी -20 वर्ल्ड कपसाठी एक मजबूत आणि संतुलित संघ तयार करण्याचा पूर्णपणे प्रयत्न करीत आहे.त्यासाठी खेळाडूंचे करिअर हे आता आयपीएलवर अवलंबून आहे.
मार्च 2020मध्ये आयपीएलच्या तेराव्या हंगामाला सुरुवात होणार आहे. या हंगामाची उत्सुकता चाहत्यांमध्ये असली तरी, हे हंगाम अनेक खेळाडूंचे करिअर तारू शकते.
भारतीय क्रिकेट संघाचा युवा यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंतने सुमारे एक महिन्यापूर्वी टी -20 संघात स्थान मिळवले होते. पंत हा विश्वचषकातील विकेटकीपर मानला जात होता परंतु आता केएल राहुलमुळे समीकरण बदलले आहे.
वर्ल्ड कपमध्ये स्थान मिळवण्यासाठी पंतला स्वत:ला सिद्ध करावे लागणार आहे. पंतच्या फॉर्ममध्ये सातत्य नसल्यामुळे त्याला संघातून डच्चू मिळाला. त्यामुळं संघात परतण्यासाठी पंतला आयपीएलमध्ये चांगली कामगिरी करावी लागले.
आयपीएलमध्ये पंत दिल्ली कॅपिटल्स संघाकडून खेळतो. गेल्या हंगामात पंतने 488 धावा केल्या होत्या. यात तीन अर्धशतकांचा समावेश होता.
पंतबरोबरच केएल राहुलमुळे आणखी एक फलंदाजाचे करिअर धोक्यात आले आहे. या फलंदाजाचे नाव आहे भारताचा सलामीवीर शिखर धवन. सध्या धवन दुखापतीमुळे संघाबाहेर आहे. त्यामुळं त्याला संघात पुनरागमन करण्यासाठी आधी फिट व्हावे लागेल.
शिखर धवन चांगल्या फॉर्ममध्ये असला तरी, त्याला फिटनेस सिद्ध करावा लागले. त्यासाठी आयपीएलही चांगली संधी आहे. धवनने बांगलादेशविरुद्ध दोन अर्धशतकी खेळी केल्या होत्या. तर आयपीएलमध्ये दिल्ली कॅपिटल्सकडून खेळताना त्यानं गेल्या हंगामात 521 धावा केल्या होत्या.
भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीनं भारताला दोन वर्ल्ड कप जिंकून दिले आहेत. मात्र वर्ल्ड कप 2019नंतर धोनीनं एकही आंतरराष्ट्रीय सामना खेळलेला नाही. त्यामुळं धोनी निवृत्ती घेणार का?, असा प्रश्न चाहत्यांमध्ये आहे.
धोनीला संघात पुन्हा जागा मिळवण्यासाठी आता आयपीएलचा पर्याय उरला आहे. दुसरीकडे धोनीचा अनुभव विराटसाठी महत्त्वाचा असेल. धोनीच्या चेन्नई संघाने आतापर्यंत तीनवेळा आयपीएलचे विजेतेपद मिळवले आहे. मात्र संघात जागा मिळवण्यासाठी त्यालाही आयपीएलमध्ये चांगली खेळी करावी लागेल.