जिवलग मित्र आणि आपली पत्नी या दोघांचे प्रेमसंबंध आहेत आणि त्याने आपला घटस्फोट घडवून आणून स्वतः तिच्याशी लग्न केलं यापेक्षा मोठा विश्वासघात अजून कोणता असू शकेल. असाच काहीसा प्रकार टीम इंडियाच्या दोन स्टार क्रिकेटर्समध्ये घडला आहे, जे एकेकाळी खूप खास मित्र होते. दोघेही अनेक वर्षे एकाच संघाकडून देशांतर्गत क्रिकेट खेळले. यादरम्यान दोघांची मैत्रीही खूप घट्ट झाली. पण नंतर त्यांच्यामध्ये लव्ह ट्रँगल आला, ज्यामुळे त्यांची मैत्री तर संपलीच पण त्यांचे वैयक्तिक आयुष्यही विस्कळीत झाले.
ही गोष्ट आहे भारतीय क्रिकेटपटू दिनेश कार्तिक आणि मुरली विजय या दोघांची. परंतु त्यांच्या मैत्रीत आलेल्या लव्ह ट्रँगलमुळे त्यांची मैत्री कायमची संपुष्टात आली. एकेकाळी दोघेही खूप चांगले मित्र होते, पण मुरली विजयमुळे दिनेशचा घटस्फोट झाला. या घटस्फोटाने दोन अतिशय चांगल्या मित्रांची मैत्रीही कायमची तुटली.
2007 मध्ये 21 वर्षीय दिनेश कार्तिकने त्याची बालपणीची मैत्रीण निकिता वंजारा हिच्याशी लग्न केले. निकिताचे वडील आणि दिनेशचे वडीलही चांगले मित्र होते. अशा परिस्थितीत निकिता आणि दिनेश एकमेकांना लहानपणापासून ओळखत होते आणि एकत्र वाढले होते. निकिता आणि दिनेश लग्नाच्या वयात येताच दोघांच्याही घरच्यांनी लग्नासाठी होकार दिला आणि दिनेश आणि निकिता यांचं मुंबईत लग्न झालं.
2012 मध्ये विजय हजारे ट्रॉफीमध्ये कर्नाटक विरुद्ध रोमांचक सामना खेळला जात होता. या सामन्यादरम्यान दिनेश कार्तिकला त्याची पत्नी निकिता आणि मित्र मुरली विजय यांच्या अफेअरची माहिती मिळाली. विजय आणि निकिता यांच्यातील अफेअरबाबत कळल्यानंतर दिनेश कार्तिक खूप खचला होता. जवळचा मित्र आणि स्वतःच्या पत्नीकडून फसवणूक झाल्यानंतर दिनेश कार्तिकने पत्नी निकिता सोबत घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला.
2012 मध्ये दिनेश कार्तिकशी घटस्फोट घेतल्यानंतर निकिता आणि मुरली विजयने त्याच वर्षी लग्न केले. 2013 मध्ये विजय आणि निकिता यांच्या मोठ्या मुलाचा जन्म झाला. निकिताने दिनेशला घटस्फोट दिला तेव्हा ती गरोदर होती आणि हे मुलं मुरली विजयचे होते, असे अनेक रिपोर्ट्समध्ये सांगण्यात आले होते. यानंतर 2014 आणि 2017 मध्ये निकिता आणि मुरली पुन्हा पालक झाले.