अद्वैत मेहता, पुणे, 08 जून: पुण्यातील मुळशी तालुक्यामध्ये असणाऱ्या उरवडे याठिकाणी SVS Aqua Technologies कंपनीला लागलेल्या आगीत 15 महिलांसह एकूण 18 जणांनी जीव गमावला आहे. दरम्यान या कंपनीमध्ये लागलेली आग नियंत्रणात आणली असली तरी काही ठिकाणी अद्यापही काही भागात आग धुमसत आहे.
या आगीत 18 जणांचा होरपळून मृत्यू झाला, दरम्यान त्यांच्या मृतदेहांची ओळख पटवणंही कठीण होत आहे. त्यामुळे dna टेस्ट करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिली जाणार आहेत.
या दुर्घटनेमुळे संपूर्ण परिसरावर शोककळा पसरली आहे. या अनपेक्षित घटनेमुळे अनेकांचे संसार काही क्षणातच उध्वस्त झाले आहेत.
दरम्यान मंगळवारी सकाळी 9 च्या सुमारास राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील आणि खासदार सुप्रिया सुळे घटनास्थळी पोचणार आहेत
शिवाय मृतांच्या कुटुंबीयांना राज्य सरकारकडून प्रत्येकी पाच लाख रुपयांची मदत देण्याची घोषणा उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी केली आहे.
केमिकल तयार करणाऱ्या या कंपनीमध्ये लागलेली आग पसरत गेली आणि त्यामुळं भीषण दुर्घटना घडल्यानं 18 जणांना प्राण गमवावे लागले आहेत.
या कंपनीमध्ये जवळपास 37 मजूर काम करत होते. त्यापैकी 18 मजूर मृत्यूमुखी पडले आहेत. इतर 19 जणांना वाचवण्यात यश आलं असून त्यांच्यापैकी काही जखमींवर उपचार सुरू आहेत.
अग्निशमन दलाचे 8 बंब घटनास्थळी दाखल झाले होते. त्याद्वारे आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलं. कंपनीत अडकलेल्या मजुरांची सुटका करण्यासाटी JCB च्या साह्याने भिंती फोडून त्यांना बाहेर काढण्याचाही प्रयत्न करण्यात आला. तहसीलदार अभय चव्हाण यांनी याबाबत माहिती दिली आहे
या कंपनीमध्ये लागलेल्या आगीच्या कारणाचा शोध घेतला असता, पॅकिंगसाठी वापरण्यात येणाऱ्या प्लास्टीकमुळं आग लागल्याचं समोर येत आहे. या प्लास्टीकमुळं आग लागली आणि काही वेळातच आग वाढत गेल्यानं तिच्यावर नियंत्रण मिळवणं शक्यच झालं नाही. कंपनीमध्ये वॉटर प्युरिफायरसाठीच्या केमिकलचं उत्पादन केलं जातं.
घटनास्थळाहून समोर आलेले हे फोटो आगीची दाहकता आणि त्यामुळे झालेलं नुकसान किती मोठं आहे हे स्पष्ट करत आहेत.