कुठल्याही संसर्गजन्य आजाराशी लढण्यासाठी चांगली रोगप्रतिकारक शक्ती असणे आवश्यक आहे. मात्र असे अनेक संसर्गजन्य आजार आहेत ज्यांच्याशी लढण्याची पुरेशी शक्ती आपल्या शरीरात नसते. अशावेळी विशिष्ट लसी या आजारांशी लढण्यासाठी तसेच रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी मदत करतात.
गर्भवती मातांना आणि गर्भातील बाळांना विविध आजारांचा संसर्ग होण्याचा धोका असतो. अशावेळी लसीकरण फायदेशीर ठरतं.
टिटॅनस टॉक्साईड ही गर्भवती महिलांना 24 आठवड्यांनंतर नियमित देण्याची लस आहे. चार आठवड्यातून दोनदा ही लस महिलेला द्यावी लागते. गेल्या अनेक वर्षांपासून ही लस महिलांना दिली जाते. यामुळे गर्भातील बाळाला कुठल्याही प्रकारचा संसर्ग होत नाही.
हेपेटायटीस लस - गर्भवती महिलेला हेपेटायटीसचा संसर्ग झाल्यास होणाऱ्या बाळालाही हा आजार होण्याची दाट शक्यता असते. त्यामुळे हे टाळण्यासाठी हेपेटायटीस लस टोचली जाते.
टीडॅप लस - धनुर्वात (टिटॅनस), डायफ्थेरिया (Diphtheria), पर्टुसिस(Pertussis) साठी दिली जाणारी ही लस. ही लस नवीन असून या लशीसंदर्भात अद्याप जागरूकता नाही. धनुर्वात झाल्यास महिलेचा जीव धोक्यात येतो. डायफ्थेरियाहा श्वसनाचा संसर्ग असून तो श्वसनाच्या समस्या, पॅरेलिसीस आणि कोमा यांना कारण ठरतो. पर्टुसिस हा एक संसर्गजन्य जीवाणूंचा आजार असून तो नवजात बालकांमध्ये मृत्यूचं कारण ठरू शकतो. त्यामुळे ही लस गरोदरपणाच्या 27-36 व्या आठवड्यात घ्यावी लागते.
टायफॉईड- स्त्रियांना प्रसूतीनंतर टायफॉईड होऊ नये म्हणून लस दिली जाते. ही लस घेतल्यानंतर गर्भवती स्त्रियांनी गर्दीच्या ठिकाणी जाऊ नये तसंच बाहेरून आल्यावर हात साबणाने स्वच्छ धुवावेत जेणेकरून बाळाला संसर्ग होणार नाही.
गर्भवती महिलांना एचपीव्ही, गोवर,रुबेला, गालगुंड, कांजण्या या लसी देत नाहीत. या आजारांपासून संरक्षण मिळवण्यासाठी गर्भवती महिलांनी गर्भधारणा करण्यापूर्वी किमान दीड महिना आधी या लसी घ्याव्यात.
डॉक्टरांचा सल्ला घेतल्यानंतरच लसींची आखणी करा. हे तुम्हाला आणि तुमच्या बाळाला रोगमुक्त आयुष्य जगू देईल, असा सल्ला नवी मुंबईतील खारघरच्या मदरहूड हॉस्पिटलमधील प्रसूती आणि स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. अनु विज यांनी दिला आहे.