भारतात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढते आहे. आतापर्यंत 11 लाखांपेक्षा अधिक कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे.
भारतात दररोज आढळणाऱ्या नव्या कोरोना रुग्णांचं प्रमाणही वाढलं आहे आणि याचं कारण म्हणजे भारतात चाचण्याही मोठ्या प्रमाणात होत आहेत. थायरोकेअर या प्रायव्हेट लॅबने देशभरात केलेल्या अँटिबॉडी टेस्टचा अहवाल नुकताच जारी केला आहे.
कोरोनाव्हायरसची लागण झालेली असल्यास त्याविरोधात शरीरात अँटिबॉडीज तयार होतात. शरीरात अँटिबॉडीज असणं म्हणजे त्या व्यक्तीला आधी कोरोना झालेला असू शकतो.
दिल्लीत 23.48 टक्के लोकांमध्ये कोरोनाविरोधात अँटिबॉडीज मिळाल्यात. दिल्लीतील 47 लाख लोकांना कोरोना झाला मात्र त्यांच्यामध्ये लक्षणं दिसून आली नाहीत.
मुंबईतही अनेकांना कोरोना होऊन गेला मात्र त्यांना याची माहितीच नाही. थायरोकेअर लॅबने केलेल्या अँटिबॉडी चाचण्यांमध्ये वरळीत 32.15 टक्के, घाटकोपरला 36.7 टक्के, सांताक्रुजला 31.45 टक्के तर वांद्रे पश्चिमेला 17 टक्के जणांना कोरोनाचा संसर्ग होऊन गेल्याचं या रिपोर्टमध्ये समोर आलं आहे.
कोरोनाव्हायरस हा हवेतूनही पसरू शकतो. फक्त शिंकताना, खोकतानाच नाही तर बोलताना आणि श्वासामार्फतदेखील व्हायरसचं संक्रमण होऊ शकतं, असं संशोधकांनी म्हटलं. जागतिक आरोग्य संघटनेनेदेखील हवेतून कोरोना पसरू शकतो ही शक्यता नाकारली नाही. काही ठिकाणी हवेतून कोरोना पसरण्याचा धोका आहे, असं WHO ने म्हटलं आहे. त्यामुळे ज्या कोरोना रुग्णांमध्ये लक्षणं दिसत नाहीत, असे रुग्णदेखील कोरोना पसरण्यास कारणीभूत ठरू शकतात आणि लक्षणं न दिसणाऱ्या या रुग्णांमुळे आता चिंता वाढली आहे.