लॉकडाऊनच्या काळात सर्वाधिक मजूर बिहारमध्ये परतले आहेत. याच बिहारमध्ये जहानाबाद जिल्ह्यात धरनई हे गाव आत्मनिर्भर होण्यासाठी मॉडेल ठरू शकतं. आदर्श गाव ठरलेल्या या ठिकाणी सर्व कुटुंबांना सौर उर्जेवर तयार होणारी वीज स्वस्तात मिळते. तसंच गरजेच्या जवळपास सर्व वस्तू गावातच उपलब्ध होतात.
तेलंगणातील वारंगल जिल्ह्यात गंगादेवीपल्ली हे गाव सामाजिक विषमता विसरून एकत्र आलं. या गावाने विकासाच्या दिशेनं पावलं टाकत पाणी शुद्धीकरण, केबल टीव्ही, पक्के रस्ते, लाइट यांसह सर्व सुविधा निर्माण केल्या. गावच्या समस्या गावपातळीवर सोडवून एक आदर्श गाव अशी ओळख तयार केली.
महाराष्ट्रात अहमदनगर जिल्ह्यातील हिवरे बाजार या गावाचा कायापालट सरपंच पोपटराव पवार यांनी केला. 1989 पर्यंत डोंगर आणि शेती उजाड झाली होती. लोक व्यसनांच्या आहारी गेले होते. तेव्हा पोपटराव पवार सरपंच झाल्यानंतर गावात अनेक सुधारणा केल्या. आता गावातील 50 ते 60 लोकांचं वार्षिक उत्पन्न 10 लाखांपेक्षा जास्त आहे.
राजे महाराजांसाठी ओळखल्या जाणाऱ्या राजस्थानमध्ये पंपलांत्री हे गावही आदर्श गावांपैकी एक आहे. राजसमंद जिल्ह्यातील 6000 लोकसंख्येच्या या गावाने एकतेचा आदर्श दाखवून दिला. प्रत्येकाच्या हाताला काम आहे. देशातच नाही तर जगात एक निर्मल गाव, स्वजल गाव, आदर्श गाव आणि पर्यटक गाव झालं आहे.
गुजरातमधील बनासकांठा जिल्ह्यातील पुंसारी हे गावही आत्मनिर्भर गाव म्हणून आदर्श आहे. अत्याधुनिक सेवा सुविधा असलेल्या या गावात वायफाय, सीसीटीव्ही लावण्यात आले आहेत. गावातून शहरात जाण्यासाठी एक्सप्रेस बससेवा आहे. 2010 मध्ये या गावाला आदर्श गाव पुरस्काराने गौरवण्यात आलं होतं.