यूट्यूबवर 12 लाखांहून अधिक सबस्क्राइबर्स असलेला देशातील प्रसिद्ध बाइक रायडर अगस्त्य चौहान याचा अपघात झाला आहे. यामुळे त्याच्या लाखो चाहत्यांसाठी ही वाईट बातमी आहे. आग्राहून दिल्लीला जात असताना यमुना एक्स्प्रेस वेवर त्याचा अपघात झाला. चौहान याची रेसिंग बाइक दुभाजकावर आदळल्यानंतर अनियंत्रित झाली. त्यानंतर त्याचे डोके जमिनीवर आदळले आणि हेल्मेट पूर्णपणे फुटले यात अगस्त्य चौहान याचा जागीच मृत्यू झाला. अगस्त्य कावासाकी निन्जा बाईक चालवत होता. त्याचा वेग ताशी 300 किलोमीटरपर्यंत असल्याची माहिती समोर आली आहे.
यूट्यूब व्हिडिओ शूट करत असताना चौहान आपली रेसिंग बाइक ताशी 300 किलोमीटर वेगाने चालवत होता. यादरम्यान, अलीगढ जिल्ह्यातील यमुना एक्सप्रेसवेवर किलोमीटर दगडाला वाहन आदळल्यानेअपघात झाला. दरम्यान अगस्त्य हा त्याचाच विक्रम मोडण्याचा प्रयत्न करत होता. यापूर्वी त्याने ताशी 250 किमी वेगाने दुचाकी चालवली होती. त्याचे साथीदार घटनेच्या वेळी व्हिडिओ शूट करत होते. दुसऱ्या बाईकमध्ये बसलेल्या साथीदाराचा वेग ताशी 250 किमी होता. दरम्यान, अगस्त्याच्या दुचाकीने त्यांना ओव्हरटेक केले. यानंतर अगस्त्यचा तोल गेला
उत्तराखंडची राजधानी डेहराडूनमधील चक्रता रोड कपरी ट्रेड सेंटरमध्ये राहणारा 22 वर्षीय अगस्त्य चौहान आग्राहून नोएडाला जात होता. अगस्त्य यमुना एक्स्प्रेस वेच्या 47 क्रमांकाच्या किलोमीटर दगडाजवळ दुचाकीवरील नियंत्रण सुटले आणि ती दुभाजकावर आदळली. त्यामुळे अगस्त्यच्या हेल्मेटचा चक्काचूर झाला. प्रचंड रक्तस्त्राव झाल्याने अगस्त्य चौहान याचा जागीच मृत्यू झाला.
अपघाताची माहिती मिळताच अलिगढ पोलीस घटनास्थळी पोहोचले, त्यांनी मृतदेह ताब्यात घेतला आणि ग्रेटर नोएडा येथील जेवार येथील कैलाश हॉस्पिटलच्या शवागारात पाठवला. दुचाकी नोंदणी क्रमांकाच्या आधारे अलीगढ पोलिसांनी डेहराडून पोलिसांशी संपर्क साधला आणि अगस्त्य चौहानच्या कुटुंबीयांना या अपघाताची माहिती दिली. अगस्त्यच्या आई आणि वडिलांसह इतर कुटुंबीय अलिगढला आले आणि पोस्टमॉर्टमनंतर मृतदेह डेहराडूनला घेऊन गेले.
अलीगढचे वरिष्ठ पोलिस अधीक्षक IPS कलानिधी नैथानी यांनी या घटनेबाबत सांगितले की, या रस्ता अपघातात प्रसिद्ध YouTuber बाइक रेसरचा मृत्यू झाला आहे. शवविच्छेदनानंतर मृतदेह त्याच्या कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आला आहे. आमचे सर्वांना आवाहन आहे की वाहन चालवताना नेहमी वेग नियंत्रणात ठेवा. अतिवेगामुळे रस्त्यावर अपघात होतात. वेगाने वाहन चालवणे टाळा असे ते म्हणाले.