एक दोन नाही तर तब्बल तीन ट्रेन धडकल्या आणि एका क्षणात होत्याचं नव्हतं झालं. 4000 प्रवासी यावेळी वेगवेगळ्या ट्रेनमध्ये होते. ट्रेनची भयंकर अवस्था झाली. कोचचा चुराडा झाला आणि मृतदेह अक्षरश: कोच कापून, कोचचे तुकडे बाजूला करुन बाहेर काढण्याची वेळ आली.
ओडिसामध्ये झालेल्या या भयंकर अपघातानं देशाला मोठा धक्का दिला. काहींची पत्नी, कुणाचा नवरा तर कुणाचा मुलगा या ट्रेननं प्रवास करत असावा, अपघाताची बातमी कळताच काळजात धस्स झालं आणि फोन वाजायला लागले.
या भयंकर अपघातात 288 प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. हा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. 900 हून अधिक प्रवासी जखमी झाले आहेत. सध्या घटनास्थळी मदतकार्य सुरू आहे. या भीषण रेल्वे अपघातानंतर ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी आज एक दिवसाचा राजकीय दुखवटा जाहीर केला आहे.
आपली व्यक्ती सुखरुप आहे की नाही हे पाहण्यासाठी फोन वाजत आहेत. मृतदेह काढत असताना ट्रेन अपघातात काही फोन देखील मिळाले. यावेळी एक फोन तर सतत काळजीपोटी वाजत असल्याचं या फोटोमध्ये दिसत आहे. आपल्या जवळच्या व्यक्तीला काही झालं तर नाही ना या भीतीनं नातेवाईकांचा जीव कासावीस झाला आहे.
ओडिशाच्या बालासोर जिल्ह्यात कोरोमंडल एक्स्प्रेस आणि बेंगळुरू-हावडा एक्स्प्रेस आणि मालगाडी रुळावरून घसरल्याने हा अपघात झाला. गेल्या काही वर्षातला हा सर्वात मोठा अपघात असल्याचं सांगितलं जात आहे.
मृतांचा आकडा वाढण्याची भीती आहे. ह्या अपघाताचे फोटो अंगावर काटा आणणारे आहेत. ट्रेनचा अक्षरश: चुराडा झाला आहे. या प्रकरणी रेल्वेमंत्र्यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत.