वर्धा जिल्ह्यामध्ये बुधवारी रात्रीपासून विजांचा कडकडाट आणि ढगांच्या गडगडाटासह जोरदार पावसाने हजेरी लावली. जिल्ह्यात रात्रभर बरसलेल्या या पावसाने अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत झाले आहे. ग्रामीण भागातील काही नागरिकांच्या घरात पाणी शिरले तर काही गावांचा संपर्क तुटला आहे.
जिल्ह्यातील छोटे रस्ते आणि पुलावरून पाणी गेल्याने गावांचा संपर्क तुटला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सर्व शाळांना आज सुट्टी जाहीर करण्यात आली असून सर्व अंगणवाडी केंद्र देखील बंद राहणार आहेत.
हिंगणघाट तालुक्यातील कुंभी येथे 10 ते 15 घरात नाल्याचे पाणी शिरले आहे. लोकांना प्रशासनाच्यावतीने सुरक्षितपणे शाळेत स्थलांतरित करण्यात आले आहे, अशी माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली.
देवळी तालुक्यातील सरुल येथे यशोदा नदीच्या पुलावर पाणी असल्यामुळे वर्धा राळेगाव मार्ग बंद आहे. आंजी ते पिंपळगाव तसेच आंजी ते अंदोरी मार्गावरील पुलावरून पाणी वाहत आहे. गंगापूर पुलावरून पाणी वाहत असल्याने गावाचा संपर्क तुटला आहे. तर बोरगाव ते अलोडा मार्ग बंद झाला आहे.
समुद्रपूर तालुक्यातील वासी जवळील पुलावर पाणी असल्याने नंदोरी वासी रस्ता बंद आहे. वाघाडी नाला समुद्रपुर- वर्धा मार्ग (शेडगाव मार्गे) बंद झाला आहे. याच तालुक्यातील भोसा - सिंधी मार्गही बंद आहे. हमदापुर कांढळी रोडवरील उमरा पुलावरुन पुराचे पाणी वाहत असल्याने वाहतूक बंद करण्यात आली आहे.
हिंगणघाट तालुका चानकी ते भगवा रोड बंद झाला आहे. हिंगणघाट तालुक्यातील वाघोली ते खैराटी नाल्याला पूर असल्याने रस्ता बंद आहे. तसेच चिंचोली ते हिंगणघाट रस्ता देखील पावसाच्या पाण्यामुळे बंद आहे. हिंगणघाट ते येणोरा, कुंभी ते सातेफळ रस्ता बंद झाला आहे. तसेच पोहणा ते वेणी नाल्याला पूर असल्याने मार्ग बंद झाला आहे. तर हिंगणघाट शहरात महाकाली नगरीमध्ये काही ठिकाणी पाणी घुसले आहे.
सेलू तालुक्यातील सिंदी-पिंपरा-हेलोडी रस्त्यावरील नाल्याला पूर आल्याने पिंपरा व हेलोडी येथे वाहतुकीसाठी असलेला पर्यायी रस्ता बंद झाला आहे. सिंदी रेल्वे ते दिग्रज रस्ता, सिंदी रेल्वे ते पळसगाव बाई रस्ता, पहेलानपूर ते दहेगाव स्टे रस्ता, आलगाव ते शिवनगाव रस्ता तसेच परसोडी ते भानसोली रस्ता नाल्याच्या वरुन पाणी वाहत आहे. तसेच खडका येथे बोर नदीच्या पुलावरुन पाणी वाहत असल्याने रस्ता बंद आहे. तर काही ठिकाणी पूलच वाहून गेल्याने रस्ते ठप्प आहेत.
सेलू तालुक्यातील जयपूर ते चारमंडळ रस्तावरील बोर नदीच्या पुलावरून पुराचे पाणी वाहत असल्यामुळे दोन्ही गावांचा संपर्क तुटलेला आहे. यवतमाळ तालुक्यातील सेलुकाटे वरून भुगाव जाणारा रस्ता पाण्याखाली गेलेला आहे.
वर्धा तालुक्यातील सेलुकाटे वरून भुगाव जाणारा रस्ता पाण्याखाली गेलेला आहे. भूगाव स्टील प्लँटकडून रस्ता सुरु आहे. आज जिल्हा प्रशासनाने याबाबत माहिती दिली असून लोकांनी योग्य ती काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.