गेल्या काही दिवसांत वर्धा जिल्ह्यामध्ये पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून गाव खेड्यातील रस्ते आणि पूल वाहून गेले आहेत.
या रस्त्यावरून जाताना दुर्घटना घडू नये म्हणून प्रशासनाच्या वतीने वाहतूक बंद करण्यात आली आहे. तसेच नागरिकांनी पाण्याच्या प्रवाहातून प्रवास करण्याचा प्रयत्न करू नये, असं आवाहन करण्यात आलं आहे.
वर्धा तालुक्यातील बेलगांव येथे शुक्रवारी रात्री झालेल्या पावसामुळे नदीवरील पुल पूर्णपणे वाहून गेला. या मार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे.
हिंगणघाट तालुक्यातील आलमडोह ते अल्लीपूर मार्ग यशोदा नदी प्रवाहामुळे शुक्रवारपासून बंद आहे. पर्यायी मार्ग उपलब्ध आहे.
सेलू तालुक्यातील धानोली मेघे ते बेलगाव या गावांना जोडणाऱ्या लोकवर्गणीतून बांधलेल्या पुलाच्या दोन्ही बाजूकडील भाग वाहून गेला आहे. या मार्गावरून फारशी वाहतूक होत नाही.
धानोली मेघे ते बेलगाव या मार्गाचा वापर मुख्यत्वे शेतकरी व मजूर करतात. पर्यायी मार्ग तीनशे मीटर अंतरावर महामार्गावरून उपलब्ध आहे.
वर्धा तालुक्यातील पवनार सेवाग्राम रोडवर नागझरी नाल्यावरील पुल पावसामुळे पूर्णपणे वाहून गेला आहे. सुरक्षेच्याकारणास्तव बॅरिगेट लावून वाहतूक बंद करण्यात आली आहे.