भारत हा खेड्यांचा देश असून शेतीप्रधान आहे. ग्रामीण भागामध्ये शेती हा प्रमुख व्यवसाय असून अर्थकरणाची दिशाही शेतीशी निगडित असते.
देशातील बहुसंख्य लोकसंख्या शेतीशी निगडीत आहे. त्यामुळे शाळांमध्ये जवळपास 75 टक्के विद्यार्थ्यांची कौटुंबिक पार्श्वभूमी शेतकरी असते.
विद्यार्थ्यांना शेतीची गोडी निर्माण व्हावी म्हणून शालेय अभ्यासक्रमात शेती विषयाशी संबंधित पाठ्यक्रमाचा समावेश केला जातो.
विद्यार्थ्यांना शेतीशी संबंधित ज्ञान मिळावे म्हणून शाळांमध्ये विविध उपक्रम राबविले जातात. शेतीशाळा हा असाच एक उपक्रम आहे.
सांगली जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळांत विविध शालेय उपक्रम राबविले जातात. कडेगाव तालुक्यातील अमरामपूर व शिवणी जिल्हा परिषद शाळांमध्ये शेतीशाळा हा उपक्रम राबविण्यात आला आहे.
शेतीची कामे, फळे, भाज्या, कडधान्य, तृणधान्य, सुकामेवा इतर पदार्थात असलेली औषधी गुणधर्म, औषधी वनस्पती उपचार व आजार, आपला आहार, या विषयी शालेय मुलांना माहिती देण्यासाठी शेतीशाळा हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे.
शेतीशाळा प्रकल्पातून शाळांमध्ये कोबी, वांगी, फ्लॉवर, टॉमेटो, मिरची, ढोबळी मिरची, पालक, मेथी, दोडका, भोपळा अशा भाज्यांची लागवड करण्यात आली आहे.
या प्रकल्पातून मुलांना बीयांची ओळख, वाफे तयार करणे, पाणी देणे, तणनाशके, कीडनियंत्रण, पिकांची वाढ, खुरपणी, भाज्या काढणे, पिकांचा कालावधी इत्यादींचे ज्ञान कृतीतून दिले जाते.
शेतीशाळेत विद्यार्थ्यांच्या अभ्यासासाठी माहितीदर्शक डिजिटल तक्ते लावले आहेत. त्याचा उपयोग विद्यार्थ्यांना प्रकल्प पद्धतीने अभ्यास व स्वयंअध्ययन यासाठी होतो.
वनस्पतींच्या औषधी गुणधर्माबद्दल, उपयोगाबद्दल विद्यार्थ्यांना वेळोवेळी माहिती मिळते. औषध उपचारात या वनस्पतींचा प्रत्यक्ष उपयोग करून प्रत्यक्षिक अनुभव दिले जातात.
शाळेच्या परिसरात कोरफड, तुळस, बेल, पानफुटी, हिरडा, बेहडा, आवळा, शतावरी, अडुळसा, गुळवेल, सदाफुली, धोत्रा, ओवा, आले, हळद, पळस, पिंपळ, शेवगा आदी वनस्पती लावण्यात आल्या आहेत.
शालेय आरोग्य तपासणीत विद्यार्थ्यांना आहारामुळे जडणाऱ्या आजारांबाबत माहिती दिली जाते. शेतीशाळा प्रकल्पातून या आजारावरील उपाय सांगितले जातात.
या प्रकल्पाअंतर्गत उत्पादित होणारा भाजीपाला, फळे, औषधी वनस्पती यांचा शालेय पोषण आहार मध्यान्ह भोजनात वापर केला जातो, अशी माहिती शिवणी येथील शिक्षक तानाजी रामचंद्र देशमुख यांनी दिली.
शेतीशाळा उपक्रमातून मुलांच्या मनात शेतीविषयक कामांची आवड निर्माण केली जाते. तसेच श्रमप्रतिष्ठा जोपासण्याचा प्रयत्न होतो.