कोल्हापुरात मुसळधार पावसामुळे कोल्हापुरातील संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृह परिसर आणि खासबाग मैदानासाठी असणारी सामाईक भिंत कोसळून एक दुर्घटना नुकतीच घडली होती.
यावेळी नाट्यगृहात एका कार्यक्रमासाठी आलेल्या दोन महील्या या भिंतीच्या ढीगाऱ्याखाली अडकल्या होत्या. त्यापैकी एका महिलेचा मृत्यू तर दुसरी महिला गंभीर जखमी झाली होती.
दरम्यान या आधी बऱ्याच जणांनी खासबाग मैदानाच्या सुरक्षेचा मुद्दा प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिलेला आहे. मात्र आता या घटनेमुळे हा मुद्दा पुन्हा समोर आला आहे.
इतिहास अभ्यासक राम यादव यांनी यावर भाष्य करत ऐतिहासिक खासबाग मैदानाबाबत खंत व्यक्त केली आहे. प्रशासनाला केव्हा जाग येणार, असा सवालच जणू त्यांनी केला आहे.
खासबाग मैदानाची 2012-2013 साली करण्यात आलेली डागडुजी आणि सुशोभिकरण करताना भिंतींना असणारे एअर होल मुजवून त्यात दगड, सिमेंट घालून बंदिस्त करण्यात आले होते. खरंतर हे एअर होल मुजवणेच चुकीचे असल्याचे राम यादव यांचे स्पष्ट मत आहे.
या मैदानाच्याच दक्षिण पूर्व भागाकडील भिंत ही नगर विकासासाठी करण्यात आलेल्या भकास कारभारामुळेच पडली आहे, असे यादव म्हणतात.
इ. स. 1944 च्या सुमारास नगर सुधारणा योजनेत मैदानाचा दक्षिणेकडील भाग तोडून काढून त्यामागे रस्ता करण्यात आला होता. म्हणजेच तो भाग शाहूकालीन नसून त्यानंतरचा असल्याचे यादव यांनी सांगितले.
दरम्यान कोणत्याही ऐतिहासिक वास्तूंच्या संवर्धनाचे काम खूपच महत्वाची बाब असेल तरच करावे. हे काम खूप विचारपुर्वक आणि अभ्यासाअंती करणे गरजेचे आहे, असेही त्यांनी सांगितले आहे.
तर प्रशासनाने आत्ता तरी जागे होणे गरजेचे असून अन्यथा निरपराध लोकांचे प्राण घेण्यास प्रशासनच कारणीभूत ठरेल, असे शेवटी राम यादव म्हणालेत.
दरम्यान कोल्हापूर महानगरपालिका उपायुक्त रविकांत अडसूळ यांनी घडलेली दुर्घटना नेमकी कोणकोणत्या कारणांमुळे घडली, हे बांधकाम करताना करण्यात आलेले एअर होल्स सारख्या महत्वाच्या गोष्टींचा अभ्यास केला जात असल्याचे सांगितले आहे.
त्याचबरोबर हे ऐतिहासिक बांधकाम पूर्वी ज्या पद्धतीने बांधण्यात आले होते त्या सर्व पद्धतीचा विचार करून या ऐतिहासिक खासबाग मैदान सुरक्षेच्या दृष्टीने दीर्घकालीन उपाययोजना केल्या जातील असे देखील अडसूळ यांनी स्पष्ट केले आहे.