मागील काही दिवसांपासून प्रस्तावित रिफायनरी प्रकल्पासाठी मातीपरीक्षण सुरु आहे. येथील ग्रामस्थांनी या परीक्षणाला विरोध दर्शवला आहे.
कोकणातील बारसू रिफायनरी प्रकल्पावरुन राज्यात राजकीय वातावरण तापलं आहे. याचं लोण आता थेट मुंबईत पाहायला मिळत आहे.
मुंबईतही बारसू रिफायनरी विरोधात कोकण वासियांकडून मुंबईच्या विविध स्थानकावर व रेल्वे, मेट्रोत पोस्टरच्या माध्यमातून निषेध नोंदवला जात आहे.
बारसू व इतर गावांमध्ये हा प्रकल्प उभारण्यात येणार आहे. त्यासाठी सर्वेक्षणही सुरू झालं आहे. दरम्यान, या प्रकल्पामुळे कोकणातील निसर्ग, समुद्र, फळबागांवर परिणाम होऊ शकतो अशी भीतीही स्थानिकांनी व्यक्त केलीय.
कोकणातील जैवविविधताही या प्रकल्पामुळे धोक्यात येणार असल्याचं स्थानिकांचं म्हणणं असून यामुळे प्रकल्पाला विरोध केला जात आहे.
बारसू सोलगाव आणि पश्चिम भागातील काही गावांची जमीन या प्रकल्पासाठी देण्यात येणार आहे. रिफायनरीसाठी जवळपास चौदा हजार एकर जागा आणि बंदरासाठी जवळपास 2414 एकर जागा देण्यात येणार आहे.