राज्यातील रुग्ण बरे होण्याचं प्रमाण (Recovery Rate) हे 85.86 एवढं झालं आहे. रविवारीच्या आकडेवारीनुसार 11 हजार 204 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत तर आजपर्यंत एकूण 13 लाख 69 हजार 810 करोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत.
राज्यातील कोरोना रुग्ण बरे होण्याचं प्रमाण दिलासादायक असलं तरी आता नव्या संशोधनामुळे चिंता वाढली आहे. कोरोना रुग्ण बरा झाल्यानंतर त्याच्या शरीरात तयार होणाऱ्या अँटिबॉडीज काही दिवसांतच झपाट्याने कमी होत आहेत.
आतापर्यंत झालेल्या अभ्यासात कोरोनाची लागण झाल्यानंतर दोन ते तीन आठवड्यांपर्यंत सर्वाधिक अँटिबॉडीज तयार होतात आणि त्या कमीत कमी तीन महिन्यांपर्यंत राहतात, असं दिसून आलं होतं.
मात्र आता कोरोना रुग्णाच्या शरीरातून कोरोनाव्हायरस पूर्णपणे गेल्यानंतर आणि त्याच्यातील लक्षणं कमी झाल्यानंतर त्याच्या रक्तातील अँटिबॉडीज काही आठवड्यांतच वेगाने कमी होतात. एमबोओ या जर्नलमध्ये हे संशोधन प्रसिद्ध करण्यात आलं आहे.
जेव्हा रुग्ण पूर्णपणे बरा होतो, त्याच्यामध्ये कोणतीच लक्षणं राहत नाहीत. त्यानंतर सहा ते दहा आठवड्यात म्हणजेच दीड ते अडीच महिन्यांच्या आतच अँटिबॉडीजचा स्तर वेगानं कमी होतो, असं आढळलं.
यामुळे त्या रुग्णाला पुन्हा कोरोना होण्याचा धोका वाढतो. शिवाय इतर रुग्णांवर प्लाझ्मा थेरेपीही प्रभावी ठरणार नाही, असं संशोधकांनी सांगितलं.
मुंबईत याआधीच कोरोनाचं पुन्हा संक्रमण झाल्याची दोन प्रकरणं आढळून आली आहेत. त्यात आता राज्यात बहुतेक रुग्ण बरे होत आहेत. ही दिलासादायक बातमी असली तरी आता अँटिबॉडीजबाबतच्या या नव्या संशोधनाने चिंता वाढली आहे.