कॅन्सरवर उपचार घेताना, कॅन्सरच्या पेशी नष्ट करताना त्वचेच्या पेशी आणि केसांवरही विपरीत परिणाम होतो. कॅन्सर रुग्णांमध्ये त्वचेचा रंग बदलणं, कोरडेपणा, मुरुम, सूर्यप्रकाशाची संवेदनशीलता, खाज सुटणं, अॅलर्जी, हायपरपिग्मेन्टेशन, अलोपिसीया (केस गळणं), डोक्याच्या त्वचेला खाज, केस अकाली पांढरे होणे अशा समस्या उद्भवतात.
कॅन्सर रुग्णांनी उपचारापूर्वी, उपचारादरम्यान आणि उपचारानंतर त्वचेची आणि केसांची निगा राखण्याबाबत अधिक सावधगिरी बाळगली पाहिजे, असा सल्ला द एस्थेटिक क्लिनिक्सच्या त्वचारोग सल्लागार आणि कॉस्मेटिक त्वचारोग तज्ज्ञ डॉ. रिंकी कपूर यांनी दिला आहे.
सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्या संवेदनशील त्वचेसाठी आपल्या दैनंदिन मॉइश्चरायझिंग रूटीन कायम ठेवणं. सौम्य, हायड्रेटिंग आणि हायपोलेर्जेनिक उत्पादनं वापरून पाहा.
सुगंधित, अल्कोहोलयुक्त, प्रिझर्वेटीव्ह,इसेन्शिअल ऑईल यासारखी उत्पादनं वापरू नका कारण त्यात अॅलर्जीन असतं आणि यामुळे त्वचेची जळजळ होऊ शकते. स्क्रब, एएचए, रेटिनॉल आणि ग्लाइकोलिक अॅसिड वापरणं थांबवा.
कर्करोगाच्या रुग्णांना सूर्यापासून संरक्षण करणं अत्यंत आवश्यक आहे. बाहेर जाताना नेहमीच एक चांगले एसपीएफ असलेलं सनस्क्रीन लावा. सनस्क्रीनमध्ये झिंक ऑक्साईड, टायटॅनियम डायऑक्साइड किंवा एव्होबेन्झोन असावे. बाहेर जाण्यापूर्वी टोपी, हातमोजे, संरक्षणात्मक चष्मा घाला. दर दोन तासांनी पुन्हा सनस्क्रीन लावा.
मुरुमांवर उपचार करण्यासाठी तोंडावाटे घेण्यात येणारी प्रतिजैविक औषधं किंवा सौम्य अँटीकॅसिन क्रीम वापरा. बेन्झॉयल पेरोक्साईड किंवा सॅलिसिक अॅसिड असलेली ओटीसी क्रीम खरेदी करू नका, यामुळे त्वचा अधिक कोरडी होईल.
कर्करोगाचा उपचार थांबल्यानंतरही त्वचेची योग्य काळजी घ्या आवश्यक असल्यास तज्ज्ञ डॉक्टरांना भेट द्या.