जे लोक आयुष्यात एकटे आहेत. त्यांच्यासाठी डायरी लिहिण्याची सवय म्हणजे, आपल्या मनातील भावना दुसऱ्या व्यक्तीकडे व्यक्त करण्यासारखं आहे. डायरी लिहिल्यामुळे मन शांत होतं.
आपली भावना कागदावर उतरवून काढण्यामुळे मनातील चिंता, समस्या, वेदना, दूर होण्यास मदत मिळते. कागदावर आपल्या मनातला आक्रोश निराशा, दुःख, व्यक्त करण्याने आपल्या मनातील भावनांची तीव्रता कमी होते आणि मन शांत झाल्यामुळे आपण योग्य पद्धतीने निर्णय घेऊ शकतो. आपल्या मनात वाढलेल्या नकारात्मक भावना कमी होतात आणि त्यामुळे त्याचा मनावरील हानिकारक प्रभाव कमी होतो.
तणावपूर्ण घटनांबद्दल लिहिल्यामुळे त्यातून बाहेर पडायला मदत मिळते. तणावामुळे आपल्या शरीरावर होणारे दुष्परिणाम कमी होतात.
जेव्हा डायरीमध्ये आपण आपल्या आयुष्यातल्या महत्वाच्या घटना लिहून काढतो तेव्हा, त्या लक्षात ठेवण्यास देखील मदत होते. डायरी लिहिताना त्यावर तारीख, दिवस आणि वेळेचा उल्लेख केल्यामुळे त्या दिवसाचं भूतकाळातल्या एखाद्या घटनेशी जोडलेलं महत्वही लक्षात ठेवायला मदत होते, जेव्हा कधी मनाला वाटेल तेव्हा आपण त्या आठवणींना उजाळा मिळतो.
डायरीच्या माध्यमातून आपण आपले विचार व्यक्त करू शकतो. यात काही अनुभव, त्याबद्दलची मतं आपण लिहून काढू शकतो. दैनंदिन घटना, विचार, भावना या देखील डायरीमध्ये लिहिता येतात.
त्यामुळे आपोआपच मन शांत होतं. डायरी लिहिण्याने आपल्या मनातल्या भावना इतरांकडे व्यक्त करण्याची गरज पडत नाही. एखाद्या मित्राप्रमाणे आपण आपल्या डायरीशी बोलू शकतो.
लिखाणाची सवय सुधारायची असेल तर, डायरी लिहिण्याशिवाय दुसरा चांगला पर्याय नाही. डायरी लिहिण्याच्या सवयीमुळे आपल्याला लिखाणाची सवय लागू शकते.
सुरुवातील विषय सुचायला अडचणी येऊ शकतात. पण, लिखाणाची सुरुवात सोप्या पद्धतीने करता येते. सुरुवातीला दिवसभरात घडलेल्या घटना लिहायला सुरुवात करा. हळूहळू लेखनाची सवय लागेल आणि लिखाणात सुधारणाही होईल.
आपली महत्त्वाकांक्षा, इच्छा आणि संकल्प डायरीमध्ये लिहून ठेवण्याने ध्येयावर लक्ष केंद्रीत करता येतं. वर्षाच्या सुरुवातीला वर्षभराचं नियोजन करू शकतो. डायरीमध्ये संकल्प लिहून ठेवल्यामुळे स्वतःच्याच प्रगतीचं मूल्यमापन करता येतं.